मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातही राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाले आहे. मात्र बीड आणि जालना या दोन मतदारसंघांमध्ये टक्केवारी वाढली असून त्याला जातीय संघर्षाची झालर असल्याची चर्चा आहे. राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान झाले. पुण्यात गतवेळच्या तुलनेत मतटक्का वाढला आहे. २०१९ मध्ये पुण्यात ४९.८९ टक्के मतदान झाले होते. यंदा ५२ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले.
बीडमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. गेल्या वेळेपेक्षा यात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची किनार असल्याचे बोलले जाते. दोन्ही समाजांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे चित्र आहे. ही वाढीव टक्केवारी कोणाला फायदेशीर ठरणार, याची आकडेमोड दोन्ही उमेदवारांकडून करण्यात येत आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी मनोज जरांगे यांचे नाव घेतले होते. त्यातूनही जो जायचा तो संदेश गेला. पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनीही ‘या जातीय संघर्षाला कंटाळलो आहोत’ असे विधान केले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्ह्यातही गत वेळच्या तुलनेत चार टक्के मतदान वाढले आहे. गेल्या वेळी ६४ टक्के मतदान झाले होते. यंदा ६८ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. या दोन जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये फारसा फरक पडलेला नाही.
हेही वाचा >>> दरडोई उत्पन्नातील वाढीने आशा पल्लवित
नंदुरबारने परंपरा राखली
आदिवासीबहुल नंदुरबार मतदारसंघाने भरघोस मतदानाची परंपरा यावेळीही कायम राखली. अंतिम आकडेवारीनुसार तेथे ७०.६८ टक्के मतदान झाले आहे.
मावळमध्ये कोणाला फटका?
पिंपरी : पुणे आणि रायगड जिल्ह्यांत विभागलेल्या मावळ मतदारसंघात मागील वेळेपेक्षा पाच टक्क्यांची घट झाली आहे. येथे दोन्ही शिवसेनांपैकी घटलेल्या मतांचा फटका कोणाला बसणार, याचे आखाडे बांधण्यास सुरुवात झाली आहे. मावळमध्ये केवळ ५५.८७ टक्के मतदान झाले आहे.