Maharashtra Political Crisis Today, 10 July: महाराष्ट्रातल्या राजकारणात २ जुलैपासून उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी पक्षात बंड करुन शरद पवारांविरोधातच दंड थोपटले आहेत. तर शरद पवार यांनी कुणावरही टीका करणार नाही, नव्या जोमाने पक्ष बांधणी करणार असं म्हणत पुन्हा एकदा मैदानात उतरुन तयारी सुरु आहे. दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी हा दावा केला आहे की काँग्रेस पक्षही लवकच फुटणार आहे. तर संजय राऊत यांनी भाजपावर टीका करत जी परिस्थिती आत्ता निर्माण झाली ती भाजपामुळेच झाली आहे. त्यांनी २०१९ ला वचन पाळलं नाही त्याचा हा परिणाम आहे असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे हे यवतमाळच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी पोहरा देवीची शपथ घेऊन हे सांगितलं आहे की अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद असंच ठरलं होतं. त्याचाही उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. तसंच भाजपा हा बाजारबुणग्यांचा पक्ष झाला आहे असं म्हटलं आहे. पावसाने काही प्रमाणात राज्यातून ब्रेक घेतला आहे. तर इतरही महत्त्वाच्या घडामोडी राज्यात घडत आहेत. या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.