राहाता : वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचे अपहरण करून त्याला लुटण्यात आले व नंतर त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडली. यासंदर्भात ७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली. या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.
गणेश सखाहरी चत्तर (वय ४२, हांडेवाडी, चाचनळी, कोपरगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश चत्तर हे ८ जूनपासून बेपत्ता झाले होते. नांदुर्खी बुद्रुक शिवारात बाळासाहेब जगन्नाथ कोते यांच्या उसाच्या शेतात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. याबाबत शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल पोलिसांना १३ जूनला दिला. बेपत्ता व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या मृताचा मोबाइल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला. त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा करण्यात आला. दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाइल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला. त्यानंतर या खुनाला वाचा फुटली.
गणेश चत्तर हे रस्त्याने पायी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले व त्यांना उसाच्या कांडक्याने व हाताने मारहाण करून त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला. त्याच वेळी दोन जणांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला. मृतदेह उसाच्या शेतात टाकत त्यांच्या खिशातील मोबाइल काढून घेतला. हा मोबाइल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला, पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली. यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती. त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचे पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितले. पोलीस नाईक गजानन सोमनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी ७ अल्पवयीन मुलांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या विधीसंघर्षित मुलांना रविवारी न्यायालयापुढे हजर करणार असल्याचे निरीक्षक गलांडे यांनी सांगितले.
नशेखोर मुलांकडून हिंसक घटना
शिर्डी व राहता परिसरात अल्पवयीन मुले वेगवेगळ्या नशेच्या आहारी जात आहेत. नशा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी शिर्डीत तीन जणांनी झोपलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खिशातून पैसे काढताना केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. यापूर्वीही शिर्डीत नशेखोरांनी साईबाबा संस्थानमध्ये कामासाठी जाणाऱ्या तरुणांची हत्या केली होती. त्यानंतर पुन्हा अल्पवयीन मुलांनी मौजमजा करण्यासाठी अपहरण करून खून केल्याची घटना घडली. शिर्डी परिसरातील नशेच्या पदार्थांच्या विक्रीस आळा घालण्याची मागणी होत आहे.