मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने आक्रमक होत असलेल्या मनोज जरांगेंनी नाशिकमध्ये मराठा आंदोलकांना महत्त्वाचं आवाहन केलं. “तुमच्या पायाला हात लावून सांगतो, पुन्हा मराठा समाजाची हानी होऊ देऊ नका,” असं मनोज जरांगेंनी सांगितलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही सडकून टीका केली. जरांगेंनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत ते कुठं भाजी विकत होते आणि कुणाचा बंगला हडप केला हे सर्व मला माहिती असल्याचं म्हणत लक्ष्य केलं. तसेच तुरुंगात बेसण भाकर खाल्ल्याच्या वक्तव्यावरही टोला लगावला.

मनोज जरांगे म्हणाले, “आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. २४ डिसेंबरच्या आतमध्ये महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना ५० टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार यात काहीच शंका नाही. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, मराठ्यांच्या ओबीसीत ३२ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांचा गुणाकार केला, तर दीड ते पावणे दोन कोटी मराठा लोकांना लाभ होतोय. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी दिलं असतं, तर जगाच्या पाठीवर मराठ्यांची जात नंबर एकची प्रगत जात ठरली असते.”

“तुमच्या पायाला हात लावून सांगतो, पुन्हा…”

“मराठा समाज प्रचंड संख्येने जमला त्यासाठी मनापासून कौतूक. मात्र, या गर्दीच्या नादात आपल्या हातून काही चूकही व्हायला नको. मराठा एकवटला आहे, पण गर्दीच्या नादात अतिउत्साहात येऊ नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, पुन्हा समाजाची हानी होईल. आता समाजाची हानी होऊ देऊ नका,” असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.

“कुणाचा बंगला हडप केला, हेही मला माहित आहे”

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “कुठं भाजी विकत होते, कोणाच्या इथं काय करत होते, मुंबईला काय केलं, कोणत्या नाटकात काम केलं, कोणत्या पिक्चरमध्ये काम केलं हे सगळं मला माहिती आहे. कुणाचा बंगला हडप केला, हेही मला माहित आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ते बिचारंही माझ्याशी खोटं बोलत नाही”

“ते बिचारंही माझ्याशी खोटं बोलत नाही. मी म्हटलं की, तुम्ही मराठी जनतेचं खाल्लं, महाराष्ट्र सदनातील पैसा महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. तो पैसा खाल्ला आणि त्यामुळे त्यांना गोरगरीब जनतेचा तळतळाट लागला. तुरुंगात गेले आणि बेसण भाकर खाल्ली. यावर ते म्हणाले की, कांदाही मिळतो. मग खा आणखी पाच किलो कांदा,” असं म्हणत मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर सडकून टीका केली.