“आमच्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, कारण आम्ही आधीपासूनच कुणबी (ओबीसी) आहोत”, असं वक्तव्य मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. पाटील म्हणाले, “आमच्यामुळे कोणाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, उलट आम्हालाच धक्का लागला आहे. त्यामुळे कोणी उपोषण करो अथवा न करो, आम्ही आरक्षण घेणार आहोतच. आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार. आमच्या कुणबी (ओबीसी) नोंदी सापडल्या आहेत. आमचं हक्काचं गॅझेट देखील आहे. सातारा सरकारचे पुरावे आहेत, तरी देखील सरकारने अनेकांना कुणबी नोंदी असूनही ओबीसी प्रमाणपत्र दिलेली नाहीत.”

मनोज जरांगे पाटील म्हणाले, अनेकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यावर लिहिलं आहे की ‘सदर प्रमाणे’, म्हणजेच खालीप्रमाणे. या नोंदींनुसार ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या नातेवाईकांना देखील प्रमाणपत्रे मिळायला हवीत. परंतु, सरकार ती प्रमाणपत्रे देत नाही. अशा लाखो नोंदी सरकारने दाबून ठेवल्या आहेत. त्या नोंदी खोट्या आहेत का? हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे. ब्रिटिशकालीन जनगणनेत मराठा हा कुणबी दाखवला आहे. १८७१ मधील पुरावे देखील आहेत. मराठे हे ओबीसीच आहेत. परंतु, मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळू देत नाहीत.

मराठा आंदोलनकर्ते म्हणाले, छगन भुजबळ यांनी धनगर आणि मराठा असा वाद लावला आहे. त्यांनी ही भांडणं लावायची कामं बंद केली पाहिजेत. त्यांनी मराठ्यांविरोधात खोटी आंदोलनं चालू केली आहेत. ते प्रसारमाध्यमांसमोर कबूल करतात की ते (ओबीसी आंदोलक) त्यांचे लोक आहेत. याचा अर्थ ते आता उघडे पडले आहेत. चोरी कधी झाकली जात नाही. छगन भुजबळांनी त्याच्या माणसांमध्ये कामांची विभागणी करून दिली आहे. कोणी माझ्यावर शाब्दिक हल्ला करायचा, कोणी माझ्यावर वैयक्तिक पातळीवर हल्ला करायचा, कोणी मराठा आंदोलनावर टीका करायची, कोणी मराठा आरक्षणावर आक्षेप घ्यायचा. भुजबळ त्यांच्या लोकांना सांगतात ते संवैधानिक पदावर बसले आहेत, त्यामुळे ते काही गोष्टी बोलू शकत नाहीत. तर त्या गोष्टी ते इतरांना बोलायला सांगत आहेत.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, भुजबळांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय, तुम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात बोला. मुख्यमंत्री मराठा आहेत, त्यामुळे त्यांच्यावर टीका करा. हे सगळं बोलत असताना मी मात्र तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही आंदोलन करा. मी मंत्र्यांना तुमच्यापर्यंत घेऊन येतो. तर ओबीसी आंदोलक म्हणतात की मराठ्यांच्या उपोषणस्थळी मंत्री गेले होते तर ते आमच्या उपोषण स्थळी देखील आलेच पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकडे गेले होते तर ते आमच्याकडेही आलेच पाहिजेत, अशा प्रकारचा दबाव निर्माण केला जातोय. मुख्यमंत्र्यांवर आरोप केले जातायत. हे सगळे प्रकार करून ते सरकारला भेटीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा >> “माझी राजकीय कारकीर्द मनोज जरांगेंच्या…”, छगन भुजबळांचा पलटवार; लक्ष्मण हाकेंना म्हणाले, “आता तुम्ही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले, छगन भुजबळ मराठा आणि धनगरांमध्ये दंगल घडवून आणण्याच्या तयारीत आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगतो की राज्यात दंगल झाली तर त्याला केवळ छगन भुजबळ जबाबदार असतील. काही लोक सोशल मीडियावर लिहितात की संविधानाचं आंदोलन पाहायचं असेल तर वडी गोद्रीला जाऊन पाहा. वाघ रस्त्यावर झोपलाय तर तू झोप… पांढऱ्या मिश्या करून. तो (छगन भुजबळ) १०० टक्के मराठ्यांमध्ये आणि धनगरांध्ये दंगल घडवणार आहे. विनाकारण हे चिघळणार आहे, ते चिघळू देऊ नका. शेवटी हे त्यांचे वाद आहेत. ते तशी भाषा वापरत असतील तर ते दंगल घडवून आणणार आहेत. छगन भुजबळ काड्या लावत आहेत. ते सरकारमध्ये बसून वातावरण खराब करू पाहत आहेत.