मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, त्यांना वेगळं आरक्षण द्यावं, अशी भूमिका भुजबळांनी घेतली. तसेच त्यांनी अंबड येथील सभेतून मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला.

यानंतर आता बीड येथील जाळपोळीवरून छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर टीका केली. बीड येथील हिंसाचार मनोज जरांगे यांनीच घडवून आणला असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. भुजबळांच्या आरोपाला मनोज जरांगेंनी उत्तर दिलं आहे. छगन भुजबळ हे पागल माणसासारखं दर तासाला आपली भूमिका बदलतात, अशी खोचक टीका मनोज जरांगेंनी केली. ते छत्रपती संभाजीनगर येथे ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- भुजबळांची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका वैयक्तिक? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीड येथील हिंसाचाराबाबत भुजबळांनी केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता मनोज जरांगे म्हणाले, “ते काहीही बोलतात. त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. ते पागल झालेल्या माणसासारखं दर तासाला आपली भूमिका बदलतात. त्यांचेच लोक हॉटेल जाळतात आणि हे इतर लोकांचं नाव घेतात. आता त्यांच्याबद्दल काही आस्था राहिली नाही. त्यामुळे त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. कारण तो खूप उंचीचा माणूस होता पण त्यांनी स्वत:चा कचरा करून घेतला.”