राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तापला आहे. राज्य सरकारने अधिसूचना काढून मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन आणि उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, मराठा समाज आगामी काळात अधिक तीव्रतेने आंदोलन करणार असल्याचं समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाच्या बैठका चालू आहेत. अशीच एक बैठक आज (२९ मार्च) छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोन गट भिडल्याचं पाहायला मिळालं.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी काही जणांनी एकमेकांवर हल्ला केला. बराच वेळ दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

हाणामारी करणाऱ्या दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी एक महिला कार्यकर्ती म्हणाली, “या बैठकीद्वारे सामान्य मराठा लोकांचा आवाज दाबला जातोय. आम्ही मनोज जरांगे पाटलांबरोबर आहोत. इथे या लोकांची बैठक चालू होती. यांनी सर्वांना विश्वासात घेऊन बैठक घ्यायला हवी होती. बैठक घेण्यावरून इथे भांडण झालं.” दुसऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितलं की, आम्ही केवळ मराठा समाजासाठी इथे आलो आहोत. आम्हीदेखील अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी लढत आहोत. परंतु, यांनी आम्हाला बैठकीसाठी बोलावलं नाही. आम्ही मराठा समाजाचे घटक नाही का? काहीजण राजकीय पक्षाकडून सुपारी घेऊन, पैसे घेऊन इथे आले होते. समाजातील कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज मिळाला नाही. हे काही ठराविक जण समाजाचे मालक झालेत का?

हे ही वाचा >> “वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले, “आम्ही आता त्यांना…”

दरम्यान, ज्यांच्यावर हल्ला झाला अशा लोकांपैकी एका कार्यकर्त्याने सांगितलं की, मराठा समाजातील काही गरजवंतांनी ही बैठक आयोजित केली होती. मला या बैठकीबाबत एक संदेश मिळाला. त्यामुळे मी इथे आलो. परंतु, काही लोक ही बैठक कोणी आयोजित केली? ही बैठक कोणी बोलावली आहे? असे प्रश्न विचारत आमच्यावर तुटून पडले, काही लोकांची इथे दडपशाही चालू आहे. आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.