Maratha Reservation:  मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान संभाजीराजे उदयनराजेंची भेट घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. त्यामुळे ही भेट नेमकी कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं असतानाच स्वत: उदयनराजे यांनी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संभाजीराजे यांनी गुरुवारी कोल्हापुरात १६ जूनला मोर्चा नाही तर मूक आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं. यानंतर आज पुणे किंवा साताऱ्यात संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यात भेट होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज ही भेट झालेली नसून येत्या तीन ते चार दिवसांत ही भेट होणार असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं आहे.

आरक्षण प्रश्नी कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात

“माझ्या अगोरदच काही भेटीगाठी काही ठरल्या होत्या. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ अधिकाऱ्यांसोबत रस्त्याबाबतच्या दुरुस्तीसाठी आज महत्वाची बैठक आहे. माझ्या पूर्वनियोजित भेटी असल्याने आज आमची भेट होऊ शकणार नाही,” असं उदयनराजेंनी स्पष्ट केलं.

“ते माझे बंधू आहेत. तुमचं घर आहे तुम्हीही कधीही येऊ शकता असं मी त्यांना सांगितलं आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यात मी त्यांच्यासमवेत आहे. आम्ही भेटणार आहे. फक्त दोन तीन दिवसांतील पूर्वनियोजित भेटीगाठी संपल्या की आम्ही भेटू. त्यावेळी चर्चेतून चांगलं काहीतरी घडेल,” असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला आहे.

पुणे ते मुंबई ‘लाँग मार्च’ काढणार – संभाजीराजे

मराठा आरक्षण प्रश्नी १६ जून रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर पुढे पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

संभाजीराजेंनी याचा विचार करावा; चंद्रकांत पाटलांनी दिला सावधगिरीचा इशारा

ते म्हणाले, “समाजाला राजकीय पक्षांच्या वाद विवादात कसलेही स्वारस्य राहिले नाही. आरक्षणाची जबाबदारी केंद्र किंवा राज्याची आहे असे म्हणत लोकांना भ्रमित केले जात आहे. पण ही जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार दोघांची आहे. त्यामुळे आम्ही आंदोलनाची दिशा ठरवली आहे. कोल्हापुरात सुरुवात झाल्यानंतर पुढे प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे ५ जिल्ह्यात मूक आंदोलन होईल. त्यासाठी त्या जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांना आमंत्रित करण्यात येईल. तेथे लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात स्वत:ची जबाबदारी निश्चिात करावी”.

“ही वादळापूर्वीची शांतता आहे. कुणीही समाजाला गृहीत धरू नये. आम्ही जिल्ह्याजिल्ह्यात केवळ बैठका, चर्चाच करतोय असे नाही. त्याच दिवशी पुढील पुणे ते मुंबई या ‘लाँग मार्च’ची तयारी करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात तयारीच्या बैठका घेणार आहोत. लाँग मार्च हा सरकारला परवडणारा नसेल,” असा इशारा त्यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation bjp udyanraje on meet with chhatrapati sambhajiraje sgy
First published on: 11-06-2021 at 14:59 IST