सातारा : घाटरस्त्यांचे महत्त्व केवळ भौगोलिक दृष्टीनेच नव्हे, तर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय द़ृष्टिकोनातूनही अत्यंत मोलाचे आहे. महाराष्ट्रातील घाटमार्ग हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटक व गोवा या राज्यांच्या दळणवळणाचे महत्त्वाचे दुवे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाटमार्गांची कामे करण्यात येत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घाटरस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सुस्पष्ट धोरण आखले आहे. रस्ते वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. दरडी कोसळण्याच्या घटना घडणाऱ्या घाटात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जाळी (बोल्डर नेट), रोप बेस स्टॅबिलायझेशन आणि मजबुतीकरणाची कामे करण्यात येत आहेत. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घाटरस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर घाटांत दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

या कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. या घाटरस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. घाटमाथ्यावर वळणांच्या ठिकाणी सौरऊर्जेवर चालणाऱ्या चेतावणी दिव्यांची योजना आखण्यात येत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल. दुर्गम घाटमार्गांवर तातडीची मदत मिळण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, मदत पथक (रेस्क्यू टीम,) स्वयंसेवी संस्था आणि वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून त्वरित प्रतिसाद देणारी यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही घाटमार्ग हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असल्यामुळे या यंत्रणेशी सतत संपर्क ठेवून प्रवासी व वाहनचालकांच्या समस्या सोडवण्यात येत आहेत. घाटरस्ते वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याने काम करण्यास परवानगी मिळत नाही किंवा वेळ लागतो. त्यामुळे घाटरस्त्यांचे रुंदीकरण करण्यास अडचणी येतात. राज्याच्या विकासात घाटरस्त्यांची भूमिका कधीही दुर्लक्षित करता येणार नाही.