सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती होत असताना मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश जगात चौथ्या क्रमांकाची अर्थसत्ता म्हणून सज्ज झाल्याचा तसेच पारदर्शक कारभारातून देश भ्रष्टाचारमुक्त झाल्याचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून पालकमंत्री गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळाचा आढावा घेताना अनेक आघाड्यावर देशाने प्रगती केल्याचे नमूद केले. ते म्हणाले, २०१४ सालापूर्वीचा भारत आणि त्यानंतरच्या अकरा वर्षांनंतरचा भारत यात मोठा फरक आहे. पूर्वी काँग्रेसच्या कार्यकाळात देशात सरकारी योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत होता. सरकारी योजनेचा एक रुपया लाभार्थींपर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील ८५ पैसे गायब व्हायचे आणि फक्त १५ पैसेच लाभार्थ्यांना मिळायचे. त्याची थेट कबुली काँग्रेसच्याच तत्कालीन पंतप्रधानांनी दिली होती. त्याचा दाखला देत, गोरे यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात सरकारी योजनांचा लाभ शंभर टक्के लाभार्थ्यांनाच मिळतो. त्यातील वाटा मधल्या दलालांना अजिबात मिळत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून सरकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी मोदी सरकार सामान्य जनतेला बांधिल राहिले आहे. यातून नव्या भारताचे वेगळेपण अधोरेखित होते, असे गोरे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकसित भारतात अमृतकाळ निर्माण झाला असून, आत्मनिर्भर आणि विकासाचे युग घेऊन येणारा देश म्हणून भारताची ओळख तयार होत आहे. यातून मोदी सरकारच्या विषयी सामान्य माणसाचा विश्वास अधिकाधिक दृढ होत असून, देशातील अवघे १४० कोटी नागरिक मोदी सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत, असाही दावा गोरे यांनी केला. यावेळी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर उपस्थित होत्या.