सातारा : माण – खटावसह अनेक भागांत अनपेक्षित अतिवृष्टीने रस्ते, घरे, शेतरस्ते, पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे चित्र अतिशय गंभीर आहे. आमचे सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम आहे. माता – भगिनींसह शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम आम्ही निश्चित करणार आहोत. त्यासाठी शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी पंचनामे करत आहेत. राज्य आणि गरज पडली तर केंद्र सरकारकडूनही नुकसानग्रस्तांना मदत केली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
माण, खटाव तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, प्रांत उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, मुख्याधिकारी सचिन माने, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, बांधकामसह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जयकुमार गोरे यांनी मलवडी, कुळकजाई, श्रीपालवण, परतवडी, आंधळी, पळशी, म्हसवड या भागांत प्रत्यक्ष बांधावर आणि पडझड झालेल्या घरे, पूल आणि रस्त्यांना भेटी देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. गोरे म्हणाले, की गेल्या ५० वर्षांतील सर्वात मोठा पाऊस राज्यातील विविध भागांत झाला. रस्ते, शेती, घरे आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. माता – भगिनी आणि शेतकरी धाय मोकलून रडत आहेत. पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेल्या नगदी पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. नुकसानीचे चित्र अत्यंत गंभीर आहे. आमचे सरकार सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम आहे. आम्ही सर्व नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसणार आहोत. शेती, घरे, रस्ते आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सातारा जिल्ह्यातही कृषीसह सर्वच विभागांना नुकसानीचे पंचनामे फिल्डवर जाऊन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नुकसानग्रस्तांना राज्य आणि केंद्र शासनाकडूनही मदत केली जाणार आहे. मंत्रालयातील वॉर रुममधून दररोज नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. माण – खटावसह दुष्काळी भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत नाही. आत्ताच्या अनपेक्षित पावसाने बंधारे, तलाव भरले असले तरी नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचेही गोरे यांनी सांगितले.