केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेल्या खळबळजनक विधानवरून महाराष्ट्रातील राजकारणत तापलेलं असताना भाजपा आणि शिवसेनेत जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांना अटक केल्यानंतर भाजपाच्या प्रमुख नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया आल्या होत्या. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील याप्रकरणी भाष्य केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा पाठिंबा पाहून हताश होऊन ही पावले उचलली आहेत असे स्मृती इराणी म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या अटकेनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणाऱ्या लोकांनी मौन बाळगल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “ही दुखःद गोष्ट आहे की संविधान आणि कायद्याचे उल्लंघन केले आहे. महाराष्ट्र सरकारने जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा पाठिंबा पाहून हताश होऊन ही पावले उचलली आहेत. आमच्या पक्षाच्या प्रमुखांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे,” असे स्मृती इराणी म्हणाल्या.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार “ज्यांना अटकेसंदर्भात आदेश देण्याचा कायदेशीर हक्क नाही अशा मंत्र्याने राणेंना अटक करण्याचे आदेश दिले. राणेंना अटक करण्याचे महाराष्ट्र सरकारचे राजकीय षडयंत्र आहे, असे स्मृती इराणींनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली होती. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री जामीन मंजूर केला. मात्र, दिवसभर राणे यांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने राजकीय वातावरण तापले होते.

दरम्यान,  मंगळवारी राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. मुंबईतील जुहू परिसरातील राणे यांच्या निवासस्थानासमोर युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. भाजपचे काही कार्यकर्तेही तिकडे आल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. राणे समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

नीतेश राणे यांनी ‘इकडे येऊन दाखवा’ असे आव्हान शिवसैनिकांना दिले होते. हे आव्हान स्वीकारून शिवसैनिक आले. आम्ही उंदराच्या बिळासमोर आलो आहोत. पण त्यांनी काय केलं, असा सवाल सरदेसाई यांनी केला. आम्ही शांतपणे निदर्शने करत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर दगडफेक केली. पोलीस लाठीमार करत आहेत. उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. ते मुख्यमंत्री नंतर आधी शिवसेना पक्षप्रमुख आहेत. त्यांच्यासाठी आम्ही एक काय, हजार लाठय़ा खाऊ. भाजपच्या भाडोत्री कार्यकर्त्यांना पळवून लावू, असे सरदेसाई यांनी माध्यमांना सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister who has no portfolio is ordering police officers to arrest narayan rane smriti irani abn
First published on: 25-08-2021 at 13:31 IST