एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. पण, अद्याप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सोमवारपासून ( २० फेब्रुवारी ) एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. जोपर्यंत निर्णय घेणार नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करणार, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मनसेचे नेते गजानन काळे यांनी म्हटलं की, “एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ लागू करण्याची मागणी सरकारनं मान्य केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पत्रही लिहित विनंती केली आहे. तरीही याबाबत कोणतीही पत्रक राज्यसेवा आयोगाने काढलं नाही.”
हेही वाचा : “तुम्हीच मूर्ख आहात”, भरमंचावर शिवव्याख्याता खासदार अनिल बोंडेंशी भिडला, VIDEO व्हायरल
“त्यामुळे लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये. तसेच, विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंतही पाहू नये. त्यामुळे आयोगाने लवकरात लवकर पत्रक जारी करावे,” अशी मागणी गजानन काळे यांनी केली आहे.
हेही वाचा : १२ वी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांच्या चुका; प्रश्नांऐवजी छापून आली चक्क ‘मॉडेल आन्सर’
“राज्य सरकार एमपीएससीची परिक्षा देणार्या विद्यार्थ्यांबरोबर आहे. मंत्रिमंडळ बैठकीत २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र दिले असून, लवकरच आयोग नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होईल. त्यामुळे सुरू असलेले आंदोलन मागे घ्यावे. हे सरकार एमपीएसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे”, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं आहे.