महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेल्या भाषणातून मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक आणि कोकणातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. यावरून अभिनेत्री व शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका केली. मनसेच्या कार्यक्रकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी, असा खोचक सल्ला दीपाली सय्यद यांनी दिला.
दीपाली सय्यद यांच्या वक्तव्याची मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खिल्ली उडवली आहे. दीपाली सय्यद यांच्याबाबत प्रश्न विचारताच संदीप देशपांडे म्हणाले, “आहो… सोडा ओ… कोण दीपाली सय्यद? कोण विचारतंय तिला? त्या नेमक्या कुठल्या पक्षाच्या आहेत? ते आधी सांगा. आपण कुणाला महत्त्व द्यायलं हवं, याचाही विचार केला पाहिजे.” प्रसारमाध्यमांना ‘जागर यात्रे’बाबत माहिती देताना संदीप देशपांडे यांनी ही टीका केली.
हेही वाचा- Video: “मनसेचे १३ आमदार मटक्याच्या आकड्यावर…”, राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
दीपाली सय्यद नेमकं काय म्हणाल्या?
दीपाली सय्यद ट्वीटमध्ये म्हणाल्या, “मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी. राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत, तेवढेच रस्त्यावर खड्डे आहेत. हे दोन दिवसांचं काम आहे. उगाच तुरुंगामध्ये महिनाभर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पण! युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा.”
हेही वाचा- “राज ठाकरे आहे मी, ‘हा’ आमचा जेनेटिक प्रॉब्लेम”, राज ठाकरेंचा थेट इशारा
‘जागर यात्रा’ कशी असेल?
जागर यात्रेची माहिती देताना संदीप देशपांडे यांनी पुढे सांगितलं की, राज्यातील कुठलीही शहरं घ्या, त्या शहरांना खड्ड्यांच्या समस्येनं ग्रासलेलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य खड्डे आहे. याचा नागरिकांना भयंकर त्रास होतोय. याविषयी सरकार खंत व्यक्त करतानाही दिसत नाही. समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यानंतर मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच-पाच लाख रुपये मदत देण्यात आली. मात्र, मुंबई- गोवा महामार्गावर जे अपघात झाले, त्यांना नुकसानभरपाई का नाही दिली? कोकणात परप्रांतीयांनी जमिनी विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. या सर्व प्रश्नांवर लोकांना जागृत करण्यासाठी आणि झोपी गेलेल्या सरकारला जागं करण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २३ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. ही यात्रा तीन निघेल.
