सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील बहुतांशी भागात बुधवारी पहाटे मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. शहर व परिसरात २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ग्रामीण भागात पडलेल्या पावसामुळे रब्बी ज्वारीसह इतर पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र द्राक्ष बागांसाठी हा पाऊस आणि ढगाळ हवामान हानीकारक असल्याचे मानले जाते.

बार्शी तालुक्यात पाऊस नसला तरी तेथे गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ हवामान जाणवत असल्यामुळे त्या भागातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांवर संकटाची टांगती तलवार आहे. पाऊस पडल्यास सध्या काढणीला आलेल्या सोयाबीन चे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सरलेल्या खरीप  हंगामात ४८ हजार ६८८ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला होता. त्यापैकी सर्वाधिक ३५ हजार ४०८ हेक्टर क्षेत्र एकट्या बार्शी तालुक्यातील आहे. अक्कलकोटमध्ये पाच हजार २४७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली होती. परंतु पावसाने पुरेशी साथ न दिल्यामुळे सोयाबीनची अपेक्षित वाढ झाली नाही. तरीही मोठ्या कष्टाने वाचविलेले सोयाबीन पिकांची काढणी होत असताना पहाटे  पाऊस झाला. त्यात सोयाबीनची हानी झाली.

हेही वाचा >>>सांगली: अवकाळी पावसाने दैना

गेल्या तीन दिवसांपासून सोलापूर परिसरात ढगाळ वातावरण असताना पहाटे कमीजास्त प्रमाणावर पावसाने हजेरी लावली.काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांचूया गडगडाटासह पाऊस कोसळला. शहरात सकाळ उजाडेपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या.उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा आदी तालुक्यांमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे ज्वारीसह रब्बी हंगामातील अन्य पिकांसाठी पोषक ठरणारा असल्याचे मानले जाते. तूर पिकासाठीही हा पाऊस लाभदायक असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊसमानाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती ओढवली असून खरीप पिकांच्या हंगामाला मोठा फाटका बसला आहे. रब्बी हंगामात पेरण्या अपूर्णच आहेत. अनेक भागात पेरलेल्या पिकांची पावसाअभावी उगवण झाली नाही. मात्र आज पडलेल्या पावसामुळे उर्वरीत रब्बी पेरण्या होतील. मंगळवेढा भागात ज्वारीसाठी पोषक हवामान तयार होत असल्यामुळे तेथील शेतकरी आश्वस्थ झाला आहे. पिकांच्या उगवणीसाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>>वस्रोद्योग अडचणीत असताना कामगारांना १२ टक्के बोनस

तथापि, द्राक्षबागांसाठी आजचा पाऊस आणि ढगाळ हवामान हानीकारक ठरला आहे. द्राक्ष छाटणी झालेल्या बागा सध्या फुलोरा स्वरूपात दिसत आहेत. परंतु पावसाच्या तडाख्यामुळे गळ होऊ शकते. त्यामुळे औषधांच्या फवारणीचा खर्च वाढला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजारपेठांवर पावसाचे सावट

दिवाळी तोंडावर आली असताना बाजारपेठा खरेदीसाठी फुलून गेल्या आहेत. दिवाळी फराळासाठी लागणा-या विविध जिन्नसांपासून कपडे, चप्पल, सौंदर्य प्रसाधने तसेच इलेक्ट्राॕनिक्स उपकरणे, वाहने आदी खरेदीची धामधूम वाढली आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे बाजारपेठांवर पावसाचे सावट पसरले आहे. त्यामुळे व्यापारीही धास्तावला आहे.