जालना: लग्नासाठी दिलेल्या पैशाच्या वादातून मोठ्या भावाने लहान भाऊ आणि त्याच्या मुलाचा चाकूने वार करून खून करण्याची घटना जिल्हयातील बदनापूर या तालुक्याच्या ठिकाणी घडली आहे . मंगळवारी रात्री पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारबदनापूर येथील अशोक येडूबा अंबिलढगे (५३) आणि त्यांचा मुलगा यश (२०) यांचा या चाकूहल्ल्यात मृत्यू झाला. पोलिसांनी या दोघांना शासकीय रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिका-यांना दोघांना मृत घोषित केले. मृत अशोक याने मुलीच्या लग्नासाठी मोठा भाऊ विष्णू याच्याकडून पैसे घेतले होते .हे पैसे परत मिळावेत यासाठी विष्णू कांही नातेवाईकांना घेऊन अशोक याच्या घरी गेला होता. त्यावेळी झालेल्या भांडणात विष्णू याने लहान भाऊ अशोक आणि त्याचा मुलगा यश याच्यावर चाकूने वार केले. या प्रकरणी मृत अशोक याची पत्नी संगीता अंबिलढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी विष्णू अंबिलढगे याच्यासह एकूण पाच जणांना अटक केली. सुरेश सदानंद निर्मळ, नरेश सदानंद निर्मळ, निखिल सुरेश निर्मळ आणि आदित्य विजय घुले अशी पोलिसांनी अटक केलेल्या अन्य चार जणांची नावे आहेत. हे चौघे जालना शहरातील रहिवाशी आहेत.