नांदेड : उमरी तालुक्यातील भायेगाव येथील गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एक महिला व दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ७) दुपारी घडली. गोदावरी नदीला भरपूर पाणी आल्यामुळे मृतदेह काढण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागला. या घटनेने भायेगाव गावावर शोककळा पसरली आहे.
गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या उमरी तालुक्यातील भायेगाव येथील महानंदा भगवान हनमंते (वय ३६), महानंदाची मुलगी पायल भगवान हनमंते (वय १४) आणि ऐश्वर्या मालू हनमंते (वय १२) या तिघीजणी शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गावालगत असलेल्या गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. नदीकाठावर चिखल, गाळ साचलेला होता. गोदावरी नदीला भरपूर पाणी आले होते. कपडे धूत असताना महानंदा हनमंतेही पाय घसरून नदीच्या पाण्यात पडून बुडत असताना तिची मुलगी पायल हिने आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु तिचाही पाण्यात तोल गेला. दोघीही पाण्यात बुडत असल्याचे पाहून ऐश्वर्याने आरडाओरड करत त्या दोघींना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु ऐश्वर्याचासुध्दा पाय घसरून तोल गेल्यामुळे पाण्यात पडली. वरील तिघीजणी पाण्यात बुडाल्याची माहिती जेव्हा गावकऱ्यांना समजली तेव्हा गावकऱ्यांनी गोदावरी नदीकडे धाव घेतली.
घटनास्थळावर उमरीचे पोलीसही पोहोचले. पाण्यात बुडालेल्या तिघींचा मृतदेह दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले. हे मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती भायेगाव येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव पाटील भायेगावकर यांनी दिली.
मागासवर्गीय वस्तीतील बोअर नादुरुस्त असल्याने मागील पंधरा दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे महिलांना नदीवर कपडे धुण्यासाठी जावे लागत आहे. यामुळे आजची ही घटना घडल्याचे स्थानिक नागरिक सुमेध कदम यांनी सांगितले आहे.