नुकत्याच झालेल्या दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कमला डेलकर या निवडून आल्या. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्या निवडून आल्यानंतर शिवसेनेकडून पहिल्यांदाच राज्याबाहेर शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याचा दावा केला गेला. पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी देकील त्यासंदर्भात ट्वीट करून आनंद व्यक्त केला आहे. मात्र, या मुद्द्यावरून आता भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांना खोचक इशारा दिला आहे. नारायण राणेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्याोबत उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला.

दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केल्यानंतर ही जागा रिक्त होती. या जागेसाठी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी कमला डेलकर यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या कमला डेलकर यांना शिवसेनेचा पाठिंबा होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून महाराष्ट्राबाहेर विजय मिळवल्याचा दावा केला जात आहे. यावरून नारायण राणेंनी निशाणा साधला आहे.

“..तर संजय राऊत डोक्याविना दिसतील तिथे”

“दादरा-नगर हवेलीची अपक्ष उमेदवाराने जिंकली. शिवसेनेने डंका सुरू केला की राज्याच्या बाहेर आम्ही जिंकलो. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. ती फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच”, असं नारायण राणे म्हणाले.

“शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची सवय”, नारायण राणेंचा खोचक टोला!

“शिवसेना आम्हाला यश मिळालं, आता दिल्ली काबीज करणार म्हणतेय. मोदींचं सरकार ३०३ जागांसह बहुमतात आहे. तुम्ही एका जागेनिशी धडक मारणार म्हणताय. पण धडक कशी असते हे तुम्हाला माहिती नाही. दिल्लीला धडक मारायला आलात तर डोकं राहणार नाही जागेवर. डोक्याविना संजय राऊत दिसतील तिथे”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली.

“एक तर तुम्ही जे ५६ आमदार आहात, ते मोदींमुळेच निवडून आलेला आहात. नाहीतर आठच्या वर जात नाहीत तुम्ही. अनेक वृत्तपत्रांनी केलेल्या अभ्यासात आठच आकडा होता. मोदींशी आधी युती केली आणि नंतर गद्दारी केली. त्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळालं. सध्या आकसापोटी मोदींवर टीका केली जात आहे. मोदींमुळे यांचे ५६ आणि १८ निवडून आले. पुढच्या लोकसभेला यांचे २५ आणि आठही निवडून येणार नाहीत अशी अवस्था आहे. त्यामुळे तोपर्यंत हात धुवून घ्या असं चाललंय”, असंही नारायण राणे यावेळी म्हणाले.