सोलापूर : काँग्रेसचा आरक्षणविरोध हा अलीकडचा नाही, तर खूप जुना आहे. आज दलित, आदिवासी, भटके, ओबीसींची होत असलेली एकजूट काँग्रेसच्या ‘शाही परिवारा’साठी डोकेदुखीची ठरली आहे. सर्व वंचित, उपेक्षितांची एकजूट कायम राहिली, तर शाही परिवाराला सत्ता मिळणार नाही. म्हणूनच या सर्व समाजघटकांना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागण्याचे नवे षडयंत्र काँग्रेसकडून खेळले जात आहे. हा डाव वेळीच सावधानता बाळगून हाणून पाडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गांधी परिवार यांचे नाव न घेता मोदी यांनी हा हल्लाबोल केला.

महायुती सरकारने महाराष्ट्राचा केलेला चौफेर विकास हा केवळ धोरणांचा भाग नाही, तर स्वच्छ वृत्ती असल्याचा जिवंत पुरावा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वृत्तीतच खोट आहे, अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी केली.

हेही वाचा >>>मोदी, शहा यांच्याही बॅगा तपासा; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आव्हान

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारासाठी मंगळवारी दुपारी सोलापुरात होम मैदानावर पंतप्रधान मोदी यांची प्रचार सभा झाली. त्या वेळी त्यांनी महाविकास आघाडीसह काँग्रेस, राहुल गांधी यांच्यावर कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले. महायुती सरकारने केलेल्या विकासकामांच्या बळावर राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला. या सभेस लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

आपल्या २८ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, की महायुती सरकारने माता-भगिनींना सशक्त बनविण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू करताच महाविकास आघाडीची झोप उडाली आहे. लाडक्या बहीण योजनेला विरोध करून न्यायालयात याचिका दाखल केली आणि अडथळा आणला. परंतु लाभार्थी महिलांच्या हाती पैसा येऊ लागला. त्याचे दृश्य परिणाम दिवाळीचा आनंद द्विगुणित होताना दिसून आले. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळकटी आली. महिलांच्या विकासासाठीची भाजपची हीच दूरदृष्टी असल्याचा दावा मोदी यांनी केला.

विधानसभा निवडणूक होण्याआधीच महाविकास आघाडीला भगदाड पडू लागले असून, आघाडीवाले मुख्यमंत्रिपदासाठी आपसात भांडत आहेत. एकमेकांशी भांडणातच त्यांचा पूर्ण वेळ खर्च होतो. ही मंडळी महाराष्ट्राला कधीही स्थिर सरकार देऊ शकत नाहीत. याउलट महायुती सरकार महाराष्ट्राला विकासाची नवी दृष्टी घेऊन पुढे नेत आहे, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.

हेही वाचा >>>Nitin Gadkari: उद्धव ठाकरेंनंतर आता नितीन गडकरींचीही तपासणी; हेलिकॉप्टर तपासणीचा व्हिडीओ आला समोर

मोदी हे भाषण करीत असताना जनसमुदायातून एका तरुणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणल्याचे पाहून मोदी यांनी ती प्रतिमा स्वीकारण्यास आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. तोच संदर्भ देत त्यांनी काँग्रेसवर आरक्षणाच्या मुद्द्यावर हल्लाबोल केला. काँग्रेसचा आरक्षणविरोध हा अलीकडचा नाही, तर खूप जुना आहे. दलित, आदिवासी, भटके, ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याचा काँग्रेसचा खटाटोप आताचाच नाही, तर आरक्षणविरोधात काँग्रेसने यापूर्वी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. जरूर तर जुनी वर्तमानपत्रे काढून पाहा, असे त्यांनी नमूद केले. गोरगरीब, वंचित, उपेक्षित समाजघटकांना एकमेकांपासून तोडण्याचे पाप काँग्रेसकडून होत आहे. सर्व समाज घटक विभागले, तरच काँग्रेसला प्राणवायू मिळू शकतो, असा टोलाही पंतप्रधान मोदी यांनी लगावला.

घोषणांमधून उपस्थितांशी संवाद

नरेंद्र मोदी यांनी भाषण सुरू करताना ‘जय भवानी’चा नारा दिला, तर सभा संपताना ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. याला उपस्थित जनांनीदेखील मोठा प्रतिसाद दिल्याने सभास्थळ दणाणून गेले.

मराठीत संवाद आणि विठुरायास नमन

नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेत उपस्थितांशी मराठीतूनही अधूनमधून संवाद केला. यामध्ये त्यांनी प्रारंभी ‘जय भवानी’ अशी घोषणा करत जनसमुदायाच्या भावनेला हात घातला. यानंतर ‘आज कार्तिकी एकादशी, पंढरपूरची यात्रा. आजच्या दिवशी मला या जिल्ह्यात येण्याचे भाग्य लाभले. पंढरीच्या विठुरायाला माझे कोटी कोटी नमन. संत नामदेव महाराज यांची आज जयंती. त्यांनाही माझे वंदन!’ असे म्हणताच उपस्थितांमधून टाळ्यांचा गजर झाला.

हेही वाचा >>>गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटामध्ये मुलगा ठार; उंडाळेतील भीषण दुर्घटना

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारार्थ सोलापुरात आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक धार्मिक, सांस्कृतिक, उद्योग व्यवसायांच्या परंपरांना स्पर्श करीत सोलापूरकरांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला. देशातील आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांच्या इतिहासात सोलापुरात आपण एकमेव सर्वाधिक सातवेळा आल्याचा दाखलाही त्यांनी दिला.

पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीच्या दिवशीच सोलापुरात पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे औचित्य बाळगून भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे व जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मोदी यांचे विठ्ठलाची पगडी, धनगरी घोंगडी, काठी आणि तुळशीहार प्रदान करून स्वागत केले. तोच धागा पकडून पंतप्रधान मोदी यांनी कार्तिकी एकादशीला पंढरपूरची यात्रा भरते. याच दिवशी पंढरपूरशी निगडित सोलापूर जिल्ह्यात येण्याचे भाग्य आपणास लाभले. पंढरीच्या विठूरायाला, संत नामदेव महाराजांना, सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराला, महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले. पंढरपूरच्या पवित्र धरतीवर विठ्ठलाचे सानिध्य लाभणे हा नुसता योगायोग नाही तर पुढील पाच वर्षे सोलापूरसह महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी मिळालेला आशीर्वाद मानतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या आस्था आणि प्राचीन संस्कृतीवर विश्वास ठेवून महायुती सरकार यापुढेही काम करीत राहील, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.

काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या विमानतळ विस्ताराचे लोकार्पण आपण केले होते. त्याही अगोदर येथील असंघटित कामगारांना ३० घरांचे हस्तांतरण करण्यासाठी आपण आलो होतो, सोलापूरकरांकडून असे प्रेम मिळण्याचे सौभाग्य खूप कमी लोकांना मिळते. सोलापूरकरांचे आशीर्वाद आणि प्रेम आपण स्वतःसाठी निरंतर पूजा समजतो, असे भावोद्गार पंतप्रधानांनी काढले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशाच्या विकासकामांतून दळणवळणाने जोडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गावर पूर्वी वारकऱ्यांना अनंत अडचणी सतावत होत्या. त्या दूर करण्याचे सौभाग्य आपणास मिळाल्याचाही उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला. सोलापूरच्या सभोवताली चारपदरी रस्ते, वंदे भारत रेल्वे सुरू करणे केंद्रातील भाजप आणि राज्यातील महायुती सरकारच्या कामातून शक्य झाले आहे. सोलापुरी चादर आणि येथेच तयार होणारे गणवेश सोलापूरचा लौकिक वाढवत आहेत. येथील विडी कारखाने आणि गारमेंट उद्योगाच्या विकासाची काँग्रेसने कधीही चिंता वाढवली नाही. सोलापुरात टेक्स्टाईल पार्क उभारला जात आहे. त्यातून तयार होणारी उत्पादने देश विदेशी बाजारपेठामध्ये पोहोचतील, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. सोलापुरात सर्वाधिक साखर कारखाने असल्याचा उल्लेख करीत ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या उसाला किमान पायाभूत दर (एफआरपी) केंद्र सरकारने ३१५० रुपये निश्चित केला आहे. आपले सरकार सत्तेत येण्याअगोदरही देशात काँग्रेसच्या राजवटीत इथेनॉल तंत्रज्ञान अस्तित्वात होते. परंतु पूर्वीच्या सरकारने इथेनॉल उत्पादनाला कधीही चालना दिली नव्हती. २०१४ साली सत्तेत आल्यानंतर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. लवकरच हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढविले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. त्याचा लाभ सोलापूरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निश्चित मिळेल, असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला.