साखर पट्टय़ात संमिश्र कौल, शिवसेनेला पुणे, नगर जिल्ह्य़ात मोठा फटका दयानंद लिपारे, कोल्हापूर राज्यात अन्यत्र जागांची वाढ करणाऱ्या राष्ट्रवादीची त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात लाभ झाल्याचे विधानसभेच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान राष्ट्रवादीची ही घसरण होत असताना काँग्रेसने आपल्या जागांमध्ये सुधारणा केली आहे. महायुतीतील भाजपाने आपल्या जागा राखण्यात यश मिळवले असले तरी शिवसेनेच्या जागांना मात्र महायुतीतील बंडखोरीने मोठा फटका बसला आहे. विशेषत: कोल्हापुरात सेनेचे झालेले नुकसान हे ‘जनसुराज्य’च्या नावावर उभे राहिलेल्या भाजपाच्या उमेदवारांनीच निर्णायकरीत्या केले आहे. राष्ट्रवादीचे बालेकिल्ल्यातील अपयश आणि महायुतीतील बेबनाव हीच पश्चिम महाराष्ट्राच्या निकालाची वैशिष्टय़े ठरली आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा दोन्ही काँग्रेसचा त्यातही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला हादरे बसण्यास सुरुवात झाली. सलग दोन लोकसभा आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात या दोन्ही काँग्रेसचे मोठे नुकसान झाले होते. सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची ताकद १३ वरून ११ वर आली आहे. राष्ट्रवादीची ही घसरण होत असताना काँग्रेसने आपल्या जागांमध्ये दोनने सुधारणा केली आहे. दुसरीकडे महायुतीतील भाजपाने आपल्या जागा राखण्यात यश मिळवले असले तरी शिवसेनेच्या जागांना मात्र महायुतीतील बंडखोरीने मोठा फटका बसला आहे. विशेषत: कोल्हापुरात सेनेचे झालेले नुकसान हे ‘जनसुराज्य’च्या नावावर उभे राहिलेल्या भाजपाच्या उमेदवारांनीच पाच जागांचे नुकसान केले आहे. सांगलीत ‘कमळा’ला धक्का मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा आधार देणाऱ्या सांगली जिल्ह्य़ात यंदा पक्षाला दोन ठिकाणी हादरे बसले आहेत. जत, शिराळय़ातील या पराभवामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागांमध्ये एकने वाढ झाली आहे. जिल्ह्य़ातील वाळवा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढय़ात भाजपचे बंडखोर उमेदवार निशिकांत पाटील यांनी आव्हान निर्माण केले होते. मात्र अखेरीस हा गड पाटील यांनी राखण्यात यश मिळवले. शिवसेनेचे अनिल बाबर खानापूर मध्ये पुन्हा जिंकले. कोल्हापूरमध्ये शिवसेनेविरोधात काम करणाऱ्या भाजपाला सांगलीत काही प्रमाणात शिवसेनेच्या असंतोषाचा सामना करावा लागल्याचे निकालानंतर स्पष्ट दिसत आहे. कोल्हापुरात बंडखोरीचा फटका कोल्हापुरात मागील वेळी सहा ठिकाणी भगवा फडकावणाऱ्या शिवसेनेला यंदा केवळ राधानगरीत प्रकाश आबीटकरांच्या रूपाने एकमेव गड राखता आला. काँग्रेस मुक्तीचा ध्यास घेतलेल्या भाजपला भोपळा फोडता आला नाही. काँग्रेसने आश्चर्यकारकरीत्या चार जागांवर विजय मिळवत ‘सतेज’ झाली आहे. काँग्रेसच्या या यशाला ‘आमचं ठरलंय’ची भगवी परतफेड फायदेशीर ठरली. राष्ट्रवादीने हसन मुश्रीफ, राजेश पाटील यांच्या रुपाने आपल्या दोन जागा कायम राखल्या आहेत. दरम्यान लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही ‘स्वाभिमानी’ला या निवडणुकीत सपशेल अपयश आले आहे. शेकापचा बालेकिल्ला ढासळला कधीकाळी केवळ घडय़ाळाची टिकटिक ऐकू येणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदा पाच ठिकाणी महायुतीने यश मिळवले आहे. याशिवाय जिल्ह्य़ात अपक्ष म्हणून निवडून आलेल्या दोघांचा कलदेखील महायुतीकडेच असल्याने जिल्ह्य़ात आघाडीला मोठा फटका बसल्याचे म्हणावे लागेल. ‘सोलापूर मध्य’मधील काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय, दोन्ही देशमुखांनी राखलेले आपापले गड, माढा-करमाळ्यात शिंदे बंधूनी मिळवलेले यश ही जिल्ह्य़ातील वैशिष्टय़े होती. मात्र या सर्वात जास्त चर्चा झाली ती सांगोल्याच्या निकालाची. तब्बल अकरा निवडणुकींमध्ये शेकापचा अभेद्य असलेल्या या बालेकिल्ल्यास यंदा शिवसेनेने सुरुंग लावला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे शहाजी पाटील यांनी शेकपाचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख याचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचा धक्कादायकरीत्या पराभव केला आहे. शशिकांत शिंदेंचा पराभव; राष्ट्रवादीला मोठा धक्का कराड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेने धक्कादायक पराभव केला आहे. राज्यात अन्यत्र राष्ट्रवादी आपली पडझड राखली असताना बालेकिल्ल्यातच झालेला हा पराभव पक्षाला जिव्हारी लागणारा आहे. शिवसेनेने महेश शिंदे यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी दिल्याने मतदारांनी कोरेगावात यंदा बदल घडवला आहे. सातारा जिल्ह्य़ात भाजपने खाते उघडताना दोन जागांची कमाई केली. तर, शिवसेनेने पाटणचा गड अभेद्य राखताना कोरेगावमधून महेश शिंदेंच्या माध्यमातून आणखी एका मतदारसंघावर भगवा फडकवला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला ‘कराड दक्षिण’ हा गड अबाधित ठेवताना सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला. मात्र, त्यांचे मताधिक्य घटले आहे. प्रतिस्पर्धी भाजपचे उमदेवार डॉ. अतुल भोसले यांनी त्यांना चांगलेच झुंजवले. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या ‘कराड दक्षिण’मधून पृथ्वीराज चव्हाण गतखेपेला १६,४१८ मतांनी बंडखोर उमेदवार विलासकाका उंडाळकर यांचा पराभव करीत नेतेपदाला साजेसा विजय मिळवून होते. यंदा मात्र, त्यांचे हे मताधिक्य ते राखू शकले नाहीत. पृथ्वीराजांच्या पराभवासाठी भाजपच्या राज्याच्या नेतृत्वांनी विशेष लक्ष घालून डॉ. भोसले यांना ताकद दिली होती. भाजपाध्यक्ष अमित शहा यांची सभाही झाली होती. राज्यात चमत्कारिक घडामोडी शक्य - पृथ्वीराज चव्हाण कराड : राज्यात भाजपला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या असून, शिवसेनेची सौदेबाजीची शक्ती आता निश्चित वाढली आहे. त्यामुळे आता भाजपचीच सत्ता होईल असे नाही? याबाबतचे चित्र आठवडाभरात समजेल पण, चमत्कारिक घडामोडी शक्य असून, त्यादृष्टीने चर्चा सुरू असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना राजकीयदृष्टय़ा संपवण्याचाच घाट घालून आमच्यातील ३०-३५ लोकांना फोडून ताकद लावली. पण, काँग्रेस आघाडीने कडवे आव्हान उभे करून लढताना, आमची कामगिरी गतखेपेपेक्षा चांगली राहिली. आता, लोकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडू, अशी ग्वाही चव्हाणांनी दिली. साताऱ्यात पडझड सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा आजवर बालेकिल्ला म्हणून राहिलेला आहे. मोदींच्या यापूर्वीच्या लाटेतही या जिल्ह्य़ात राष्ट्रवादीने आपले गड राखले होते. मात्र यंदा या गडाला खिंडार पडले आहे. साताऱ्यात नुकतेच भाजपावासी झालेले शिवेंद्रराजे यांनी कमळ फुलवले आहे. तर कोरेगावमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेचे महेश शिंदे यांनी या मतदारसंघात धनुष्यबाणाचा शिरकाव केला आहे. दुसरीकडे जिल्ह्य़ातील ‘कराड दक्षिण’मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी मिळवलेला विजय हा काँग्रेससाठी दिलासा देणारा असला तरी त्यांच्या मताधिक्यात कमालीची घट झाल्याने हा पक्षासाठी धोक्याचाच इशारा आहे. गटबाजीत महायुती कोमेजली पश्चिम महाराष्ट्रात महायुतीची वाढलेली ताकद पाहता विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यशाची अपेक्षा होती. वातावरणही अनुकूल होते. पण गटबाजी आणि परस्परांना शह देण्याच्या कुटिल राजकारणाने दोघांचेही नुकसान झाले आहे.