दोन महिन्यांपूर्वीपर्यंत, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या आधीपर्यंत पक्षात अजित पवार की सुप्रिया सुळे? अशी चर्चा चालू होती. त्यातून सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय कार्याध्यक्ष केल्यापासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी २ जुलै रोजी पक्षातील इतर आमदारांसमवेत केलेल्या बंडाकडे पाहिलं जात असताना आता त्यांच्यासोबत गेलेले पक्षाचे एक ज्येष्ठ आमदार व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी एक सूचक विधान केलं आहे.

रामराजे नाईक निंबाळकर बुधवारी साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय भविष्य व अजित पवार गटाचं भविष्य याविषयी भूमिका स्पष्ट केली. शरद पवारांनी नुकताच साताऱ्याचा दौरा करून काही भागांत भेटीगाठी घेतल्या होत्या. काही ठिकाणी सभाही घेतल्या. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनीही त्याच ठिकाणी जात कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यामुळे पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये आता कुरघोडी करण्याची अहमहमिका लागल्याचं पाहायला मिळत आहे.

शरद पवारांना पंतप्रधान करण्याचं स्वप्नं!

दरम्यान, रामराजे नाईक निंबाळकर यांनी १९९९ साली आपण शरद पवारांना पंतप्रधान करण्याची स्वप्नं पाहिली होती असं यावेळी सांगितलं. “१९९९ ला आम्ही शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठीची स्वप्नं पाहिली होती. त्याच पद्धतीने आता अजित पवारांना राज्याचे मुख्यमंत्री करण्याचं स्पप्न आम्ही पाहातो आहोत”, असं निंबाळकर यावेळी म्हणाले. “अजित पवारांशिवाय आम्हाला महाराष्ट्रात दुसरा माणूस दिसत नाही ज्याच्यात फक्त सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राला २१व्या शतकातलं एक प्रमुख राज्य करण्याची क्षमता आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

अजित पवार गट फुटून सरकारमध्ये सामील झाल्यापासून विरोधकांकडून एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. त्यासाठी वेगवेगळे मुहूर्तही दिले जात आहेत. आमदार अपात्रतेच्या कारवाईनंतर एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरतील आणि अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल, असेही दावे करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. “अजित पवारांना योग्य वेळी मुख्यमंत्री करायचं आहे. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत”, असं निंबाळकर म्हणाले आहेत.