Amol Mitkari On Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी आज सकाळी मराठा आरक्षणाबाबत एक विधान केलं होतं. “महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरज नाही”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे हे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी धाराशिवमधील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. यावेळी काही मराठा आंदोलकांनी आक्रमक होत राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये शिरले आणि जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाबद्दल आम्ही जाब विचारणार? मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय? हे आम्ही विचारणार, असं म्हणत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. “वाघांनी सुपारीबहाद्दराला महाराष्ट्राच्या मातीची धग दाखवली”, असं म्हणत अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे.

हेही वाचा : Manoj Jarange On Raj Thackeray : “ज्यांना आरक्षणातलं काही कळत नाही, त्यांच्यावर…”, मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना सुनावलं

अमोल मिटकरी काय म्हणाले?

“वाघांनी सुपारीबहाद्दराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखविली. ये वो शेर है जो रुकते नही, थकते नही, झुकते नही, और बिकते भी नही…, आज समजलं असेल महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्या बापाचा नाही”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं?

सोलापूर येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी “महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही, असे विधान केले. त्यावरून ठाकरेंच्या विरोधात धाराशिव येथील मराठा आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली. आज सायंकाळी राज ठाकरे धाराशिव येथे मुक्कामासाठी आले असता, त्यांना भेटून जाब विचारण्यासाठी मराठा तरूण जोरदार घोषणाबाजी करीत हॉटेलमध्ये घुसले. त्यानंतर राज ठाकरे यांनी आंदोलकांची भेट नाकारल्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला आणि तणाव निर्माण झाला होता. मुक्कामी थांबलेल्या हॉटेलमधील त्यांच्या दालनापर्यंत जाण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांवर नियंत्रण मिळविले. या दरम्यान मराठा आरक्षणावरून हॉटेल परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. एका मराठा तरूणाने सर्वांचा प्रतिनिधी म्हणून ठाकरे यांची भेट घ्यावी, असा प्रस्ताव समोर आला होता. मात्र सर्वांनाच ठाकरेंना भेटावयाचे असल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला. मात्र, त्यानंतर काही वेळाने आंदोलकांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.