नगर आणि नाशिक जिल्हय़ांतून जायकवाडीत पाणी सोडावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक झाली आहे. शनिवारी (दि. ७) औरंगाबाद, जालना, बीड व परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणूक तयारीसाठी औरंगाबाद येथे विभागीय मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आदींच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यापूर्वी जायकवाडीच्या पाणीप्रश्नी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे आंदोलन करणार आहेत. मेळाव्यातही जायकवाडीत पाणी सोडा असा ठराव मांडला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादीनेही पाणीप्रश्नी आक्रमक धोरण घेतल्याने पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील रोष अधिक वाढेल, असे मानले जात आहे.
देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात हा मेळावा होईल. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने त्यावर आंदोलन केले जाणार आहे. या प्रश्नी आम्ही आक्रमक आहोत, हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले.
जायकवाडी जलाशयात किती पाणी आहे, याचा आढावा ३१ ऑगस्टला घेऊन वरील धरणांतून पाणी सोडायचे की नाही हे ठरविले जाईल, अशी घोषणा जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी विधिमंडळात केली होती. एखाद्या धरणात ३३ टक्क्यांपेक्षा कमी पाणी असेल तर त्या क्षेत्रात टंचाई आहे, असे गृहीत धरून वरील धरणातून पाणी देण्याविषयीचा कायदा आहे. जलसंपदा नियमन प्राधिकरणांतर्गत या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियम तयार नव्हते. ते तयार केले गेले. त्यातील समन्यायी पाणीवाटपाचा कलमाबाबतचा वाद न्यायालयात आहे. पावसाने पुन्हा ओढ दिल्याने वरील धरणांतून पाणी सोडावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडूनही सुरू आहे. राजकीय पक्षांनीही या मागणीबाबत आग्रह धरला आहे. नगर जिल्हय़ातील काँग्रेस नेत्यांना अडचण निर्माण होईल, असे चित्र निर्माण केले जात आहे. नुकताच शिवसेनेने पालकमंत्री थोरात यांना घेराव घातला. अशा वातावरणात राष्ट्रवादीनेही आंदोलनाचे पाऊल उचलल्याने पालकमंत्री थोरात यांना नव्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.