लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चालली आहे अशी टीका करीत बारामतीतील महायुतीचा विजय हा राज्यातील सर्वात मोठा विजय ठरेल असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी इस्लामपूर येथे केले. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या पुढाकाराने आज शेतकरी, कामगार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस महायुतील घटक पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना श्री. बावनकुळे म्हणाले, तुतारी चिन्ह असणाऱ्या राष्ट्रवादीतुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दररोज पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चालली आहे. पण त्यांना चिन्ह मिळाले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र ही निवडणूक मोदी गॅरेंटीवर होणार आहे.
आणखी वाचा-सोलापूर : चहासाठी रेल्वेतून खाली उतरणे सराफाला पडले महागात
बारामती लोकसभा मतदार संघातल्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, बारामती मध्ये अजित पवार जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल आणि त्या उमेदवाराला ६० टक्के पेक्षा जास्त मते मिळतील, आणि बारामतीचा विजय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा विजय ठरेल. लोकसभा जागाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि केंद्रीय नेतृत्व बैठक घेऊन ठरवेल. जागा ठरल्यानंतर त्या निवडून आणण्याचा प्रयत्न महायुतीचे सगळे पक्ष करतील असेही ते म्हणाले.