राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. एकीकडे शिवसेना आणि संभाजीराजेंदरम्यान चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे भाजपा प्रदेश सचिव तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरुन या प्रकरणावर भाष्य करताना संभाजीराजेंना खासदारकीवर लाथ मारण्याचा सल्ला दिलाय.

शिवसेना आणि संभाजीराजेमंध्ये काय संवाद झाला?
राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केलेले कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करावा. त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप संभाजीराजे यांना देण्यात आला होता. शिवसेनेच्या एका मंत्र्याने संभाजीराजे यांची भेटही घेतली. संभाजीराजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत. याउलट महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे. 

संभाजीराजेंची अडचण काय?
राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपाच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. या वेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण अपक्ष लढल्यास विजयाचे गणित जुळणे अशक्य आहे. भाजपाकडे २२ अतिरिक्त मते असली तरी अतिरिक्त २० मते मिळविण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.

निलेश राणे काय म्हणाले?
शिवसेना आणि संभाजीराजेंदरम्यान चर्चा सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी ट्विटरवरुन शिवसेनेवर निशाणा साधलाय. “कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले, औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला,” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही ३१ तारखेपर्यंत आहे.