सोलापूर : मागील १५ दिवस सातत्याने पडणारा पाऊस मंदावला असला सोलापूर जिल्ह्यातील पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागात म्हणजे उत्तर व दक्षिण सोलापूरसह बार्शी, मोहोळ व अक्कलकोट या तालुक्यांत गेल्या २४ तासांत पावसाचा जोर दिसून आला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी महसूल मंडळात तब्बल ४०९ मिलीमीटर इतक्या मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. तर अन्य १६ मंडळांमध्ये आतापर्यंत ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी लागत होती. यात माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला या तालुक्यांत पावसाने कहर केला होता. तथापि, गेल्या दोन दिवसांपासून या भागांत पावसाने उसंत घेतली असताना दुसरीकडे पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत आहे.
जिल्हा प्रशासनाने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी १०.३ मिमी इतका बेताचा पाऊस झाला असला तरी यात पूर्व भागात माळशिरससह करमाळा, सांगोला या तालुक्यांत पावसाने रजा घेतल्याचे दिसून आले. मंगळवेढा, पंढरपूर येथेही पावसाने विश्रांती घेतली आहे. माढा तालुक्यात जेमतेम ५.७ मिमी इतक्यात पावसाची नोंद झाली आहे.
तथापि, दुसरीकडे बार्शी तालुक्यात ३४ मिमी इतका पाऊस बरसला. उत्तर सोलापुरात २९ तर दक्षिण सोलापुरात २२.१ मिमी नोंद झाली आहे. तर मोहोळ तालुक्यात १२.३ आणि अक्कलकोटमध्ये १०.५ असा बेताचा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७ दिवसांत एकूण सरासरी २३३.३ मिमी पाऊस झाला आहे. यात माळशिरस तालुका आघाडीवर (२८९.९) असून, त्यापाठोपाठ उत्तर सोलापूर (२९०), करमाळा (२६७.६), माढा (२६६.१), बार्शी (२५५.२) याप्रमाणे पाऊस बरसला आहे. यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी महसूल मंडळात तब्बल ४०९ मिमी इतका जोरदार पाऊस झाला असून, त्याशिवाय १६ महसूल मंडळांमध्ये ३०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यात माळशिरस तालुक्यातील दहिगाव, नातेपुते, लवंग, महाळुंग या चार महसूल मंडळांचा समावेश आहे. तसेच माढा तालुक्यातील दारफळ, रोपळे व टेंभुर्णी या तीन महसूल मंडळांमध्ये ३०० मिमीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला आहे.
सोलापूरसह वडाळा (उत्तर सोलापूर), मुस्ती (दक्षिण सोलापूर), चपळाई (बार्शी), किणी (अक्कलकोट), जेऊर, सालसे, उमरड (करमाळा) या महसूल मंडळांचाही त्यात समावेश आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात वडापूर बंधारा मुसळधार पावसामुळे फुटला आहे. भीमा नदीवर बांधलेला हा बंधारा पाण्याखाली गेला होता. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बंधाऱ्याला मोठे तडे गेले आणि काही वेळातच बंधारा फुटला. त्यामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह पार बदलून नदीतील पाणी आसपासच्या शेतात घुसल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.