Devendra Fadnavis : महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि ‘महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात पाच रेडिओ जॉकींनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना महाविद्यालयीन काळात कविता, गाणी लिहिण्याचा छंद होता असं सांगितलं. तसेच आपण एक गाणं श्रीरामावर तर दुसरं शंकरावर लिहिल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच याच कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या तिसऱ्या गाण्याबाबतही भाष्य केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
तुमच्या हिरोगिरीची सुरुवात तुम्ही कॉलेजमध्ये असताना मॉडेल म्हणून झाली, आम्ही असंही ऐकलंय की तुम्हाला मॉडेलिंगसह लिहिण्याचाही छंद आहे. तु्म्ही कवी देखील आहात, मग तुम्ही पहिलं काय लिहिलं होतं तुम्हाला आठवतं का? असा प्रश्न रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “सर्वात आधी तर मी हे सांगतो की मॉडलिंग हा अपघात होता. माझ्या काही मित्रांनी माझ्याबरोबर केलेला प्रँक होता. पण तो त्यावेळी चालला. मी सुदैवाने वाचलो आणि त्यानंतर मॉडेलिंगची कधीच हिंमत केली नाही”, असं ते म्हणाले.
“मी नेहमी सांगतो की त्यावेळी जे मॉडलिंग केलं ते तेव्हा गाजलं. गाजण्याचं कारण असं होतं की जर कुत्रा माणसाला चावला तर बातमी नसते, पण माणूस कुत्र्याला चावला तर बातमी असते. त्यामुळे माझ्या मॉडेलिंगचीही बातमी झाली होती”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
तिसरं गाणं कोणतं? फडणवीसांनी सांगितलं
“मला लिहिण्याची आधीपासूनच आवड होती. कॉलेजमध्ये असताना कविता लिहित असायचो, कवी संमेलनाला वैगेरे जायचो. लहान असताना काही कविता लिहिल्या होत्या. मात्र, एक आहे की लिहिल्यानंतर ते कधी साठवून ठेवलं नाही. जेव्हा वाटलं तेव्हा ते लिहायचं आणि स्वत: वाचायचं. पण पब्लिकली फार कधी लिहिलं नाही. मात्र, हे नक्कीच आहे की दोन गाणे लिहिले आहेत. आपल्याकडे ज्यावेळी राम जन्मभूमीबाबत सुरु होतं तेव्हा मी रामावर एक गाणं लिहिलं आहे. तसेच मी शंकरावर एक गाणं लिहिलं आहे. ते शंकर महादेवन यांनी गायलेलंही आहे. बाकी तुम्हाला सांगतो की मी आणखी एक गाणं लिहिलेलं आहे. ते गाणं तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडेल, मी तुम्हाला ते सांगणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
‘मी रामदास आठवले घराण्याचा कवी’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एक गाणं मी लिहिलेलं असून ते तुम्ही यूट्यूबवर शोधलं तर सापडेल. पण मी त्याचं नाव सांगणार नाही. यावेळी आरजे भूषण यांनी त्यांना कुठल्याही चार ओळी ऐकवून दाखवा, असा आग्रह धरला. यावर फडणवीस म्हणाले की, मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. यावेळी फडणवीस यांना कविता ऐकवून दाखण्याचा आग्रह आरजेंनी केला. यावर फडणवीस यांनी म्हटले, “तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावलेत आरसे…”