सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध आहे, असे मत माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपली हिरवळ जपली आहे. इथला हापूस आंबा नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल. तसेच, हा महामार्ग रेडी बंदराला जोडला गेल्यास जिल्ह्याला मोठा फायदा होईल, असेही केसरकर म्हणाले.

आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ह्यह्णशक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे. केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याने ६० टक्क्यांहून अधिक जंगले जपली आहेत. आमच्या पूर्वजांनी आणि आम्ही ही जंगले राखली, म्हणून आमचा विकास थांबवायचा का? लोकांनी उपाशी मरायचे का? शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणे हा कोणता न्याय आहे?

ते पुढे म्हणाले, नागपूरमध्ये वाघ दिसतात, तर आमच्या जंगलात काळा बिबट्या पाहायला मिळतो. येथे समुद्रही आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

नागपूरहून सुरू होणारा महामार्ग वाढवण बंदराला जोडला जातो, तसाच शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडला जावा. रेडी बंदरातून आयात-निर्यात सुरू झाल्यास नागपूरची संत्री परदेशात जाईल आणि सिंधुदुर्गचा आंबा दिल्ली-नागपूरला पोहोचेल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढेल.

पर्यावरण चळवळी करणाऱ्यांना आमचा विरोध नाही. पण जनतेच्या हिताच्या आड त्यांनी येऊ नये. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग हा सर्वाधिक हिरवळ असलेला जिल्हा आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आम्ही आधीच स्वीकारली आहे, असे केसरकर यांनी शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दर्शवताना स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी शहराध्यक्ष खेमराज कुडतरकर, अशोक दळवी, नीता कविटकर, नारायण राणे आदी उपस्थित होते.