या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमचा प्रश्न तुम्ही न सोडवता सरकारवर किंवा संस्थेवर विसंबून राहिलात तर तुमचा प्रश्न सुटणार नाही. तुमचा प्रश्न तुम्हीच सोडवला तर तो कायमचा मिटेल. यानिमित्ताने आज सुरू केलेली श्रमदानाची चळवळ गावकऱ्यांनी अशीच सुरू ठेवली तर तुमच्या गावची वाटचाल श्रमदानातून समृद्धीकडे राहील, असे मत सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील आशीव येथे रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी ९ पर्यंत महाश्रमदान झाले. यानंतर उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना सिनेअभिनेते कुलकर्णी बोलत होते. पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, खासदार रवींद्र गायकवाड, आमदार बसवराज पाटील, माजी आमदार दिनकर माने, पाशा पटेल, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपसभापती रेखा नागराळे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था, अध्यक्ष प्रफुल्ल पारख, कांचनमाला सांगवे, सरपंच खंडेराव लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भारतीय जैन संघटनेच्या माजी विद्यार्थ्यांनी श्रमदानास सुरुवात केली. सकाळी ९ वाजेपर्यंत आशीव पाटी ते गावापर्यंतच्या शेतातील बिल्डींगची कामे या श्रमदानातून करण्यात आली. गावातील नगरप्रदक्षिणा करत गाव स्वच्छतेचा संदेश यावेळी देण्यात आला. यात माजी विद्यार्थी संघटना, शालेय विद्यार्थ्यांनी व गावातील महिलांनी सहभाग घेतला होता. यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी म्हणाले, खरेतर आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे. कारण हा दुष्काळ आपणच निर्माण केला आहे. निसर्गाचा समतोल न राखता आपण अतिरेक केल्यानेच आज ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. जे जेथे हरवले आहे ते तेथेच शोधले तर सापडते. आपण पाणी जेथे हरवले आहे तेथेच शोधले तरच सापडेल. समारंभ संपला की आपले कामही संपले असे नाही. ते आज सुरू झाले आहे. शोध संपेपर्यंत काम सुरू ठेवले तरच तुमचा पाणी प्रश्न मिटेल, असे ते म्हणाले.

खा. रवींद्र गायकवाड यांनी आपल्या स्टाईलनेच भाषणाची सुरुवात करत दुष्काळ हा आपल्या पाचवीला पूजला असल्याची खंत व्यक्त करून आम्ही चुकीच्या ठिकाणी जमलो अशी कबुली देत व्यासपीठावर पहिल्यांदाच दुख व्यक्त केले. अशा शब्दांतील भाषणाचा तोल सावरत लातूर उस्मानाबाद जिल्हय़ातील पाणी दुसऱ्या जिल्हय़ात जाते परंतु दुसऱ्या जिल्हय़ातील पाणी या दोन जिल्हय़ात येत नाही. यामुळे मोठय़ा प्रमाणात दुष्काळ जाणवतो. हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी कृष्णेचे २१ टीएमसी पाणी या भागाला मिळवून देण्यासाठी लोकसभेत तुमचा प्रतिनिधी म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

गेल्या ५८ वर्षांत सर्वात कमी पाऊस २०१५ यावर्षी पडला तर सर्वात जास्त २०१६ यावर्षी झाला. यावरून हवामान बदलाचे वारे आता आपल्याकडे वाहू लागले आहे. दुष्काळ आल्यानंतर कार्यवाही न करता तो येण्यापासून रोखण्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी यावेळी व्यक्त केले.

पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था, आमदार बसवराज पाटील, माजी आमदार पाशा पटेल यांची भाषणे झाली. यावेळी जैन संघटनेच्यावतीने राबवण्यात आलेल्या महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात झालेल्या भूकंपातील कार्याची दखल मान्यवरांनी आपल्या भाषणातून घेतली. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे माजी विद्यार्थी, जिल्हा परिषद, जवाहरलाल विद्यालयाचे विद्यार्थी व विद्याíथनींनी मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paani foundation latur aashiv villager water problem shramdan
First published on: 25-04-2017 at 02:13 IST