सातारा : फलटण शहरासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल, कृषी व जिल्हा परिषद यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. सुमारे पन्नास कोटींचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी सांगितले.महसूल, कृषी, जिल्हा परिषद यंत्रणेतील सुमारे तीनशे पन्नास कर्मचाऱ्यांकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यानुसार सात हजार ३२८ शेतकऱ्यांनी फळबाग सोडून बागायत क्षेत्रातील २१८६.८५ हे. क्षेत्रातील टोमॅटो, भेंडी, भाजीपाला, मका, कडवळ, बाजरी व अन्य बागायती पिकांचे तीन कोटी ७१ लाख ७६ हजार रुपये आणि ७७६ शेतकऱ्यांच्या २९९.८८ हेक्टर क्षेत्रातील आंबा, पेरु, सीताफळ, डाळिंब वगैरे फळबागांचे ६७ लाख ४७ हजार रुपये असे एकूण चार कोटी ३९ लाख २४७ हजार रुपये नुकसानीचा अंदाज आहे.

फलटण, विडणी, बरड, तरडगाव महसूल मंडलातील ७५० शेतकऱ्यांच्या जमीन खचणे, नदीपात्र किंवा ओढ्याच्या प्रवाह बदलामुळे २०१.५० हे. क्षेत्रातील शेतजमिनी वाहून गेल्याने सुमारे एक कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीनुसार, तालुक्यात ११ ग्रामतलाव व पाझर तलावांचे ६२ लाख ५० हजार रुपयांचे, ४० रस्ते, पूल, डिव्हायडर, कॉज वे यांचे १४ कोटी ३८ लाख रुपयांचे, प्रा. शाळा खोल्या इमारत, प्रा. शाळा संरक्षक भिंत, छप्पर, मुतारी, अंगणवाडी दरवाजा, फरशी, आरोग्यवर्धिनी केंद्र इमारत वगैरेंचे चार कोटी ६८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ते, पूल, घरे, भिंती, नळ पाणीपुरवठा योजना विहीर, स्मशानभूमी, ग्रामपंचायत इमारत आदींचे दोन कोटी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटणमार्फत अतिवृष्टीनंतर करण्यात आलेल्या पाहणीनुसार, शिखर शिंगणापूर व सीतामाई घाट रस्त्याच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करून दरड कोसळणे रोखणे, सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या सात पुलांची नव्याने उभारणी करणे, २२ रस्त्यांच्या २८.३ किमी अंतरातील रस्त्याची दुरुस्ती करणे, ३६ पूल व मोऱ्यांची दुरुस्ती व नवीन उभारणी वगैरे तात्पुरत्या व कायमस्वरूपी कामांसाठी १४ कोटी ९९ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आंबेकर यांनी व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीज अंगावर पडल्याने, वीजेचा धक्का बसल्याने, घर वा भिंत अंगावर पडल्याने तसेच अन्य कारणांनी ३० शेतकऱ्यांची ४० जनावरे व ११ कोंबड्या मृत झाल्या आहेत. त्यांना आठ लाख नऊ हजार रुपयांचे नुकसान भरपाई अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. डॉ. अभिजित जाधव, तहसीलदार, फलटण