पंढरपूर : आषाढी यात्रेमध्ये लाखो भाविकांना दर्शनासाठी गेले २० दिवस २४ तास उभे असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा शिणवटा काढण्यात आला. आषाढी यात्रेनंतर प्रक्षाळपूजा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. विठूरायाला गरम पाणी व दह्यादूधानं स्नान घालण्यात आलं आणि आयुर्वेदिक काढाही देण्यात आला. यानंतर देवाचे नित्योपचार पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

आषाढी यात्रेत लाखो भक्तांना दर्शन देण्यासाठी विठूराया अहोरात्र उभा होता. यात्रा कालावधीत सलग २० दिवस मंदिरात २४ तास दर्शन सुरू असते. या काळात विठ्ठलाला थकवा येऊ नये म्हणून पाठीला लोड लावण्यात आला होता. याकाळात देवाचे सर्व नित्योपचार बंद होते. ते आता पूर्ववत करण्यात आले.

अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा शिणवटा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही प्रक्षाळपूजा परंपरा सुरू आहे. यासाठी मंदिरात दुपारपर्यंत दर्शनाला येणारे भाविक लिंबू आणि साखर देवाच्या पायाला चोळून दर्शन घेत होते. यामुळे थकलेल्या पायाच्या शिरा मोकळ्या होतात, अशी भावना भाविकांची आहे.

यानंतर ब्रह्मवृंदाच्या रुद्र आवर्तनाच्या जयघोषात देवाला दही, मध, साखर आणि शेवटी दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. त्यानंतर देवाला गरम केशर पाण्याने स्नान घालण्यात आले. यामुळे देवाच्या थकलेल्या शरीराला उत्साह प्राप्त होत असल्याची भावना वारकरी संप्रदायात आहे. यानंतर देवाला सुंदर पोशाख परिधान करण्यात आला.

मस्तकी सुवर्णमुकुट, गळ्यात अनमोल कौस्तुभमणी, हिऱ्याचा कंगनजोड, दंडाला दंडपट्टा आणि गळ्यात अत्यंत मौल्यवान मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, तीनपदरी सुवर्ण तुळसमाळ, मारवाडी पेठ्यांचे हार, अशा विविध अलंकाराने नटलेल्या विठुरायाचे सौंदर्य अतिशय खुलून दिसत होते.

रुक्मिणीमातेलाही सुवर्णमुकुट, वाक्या, तोडे, तानवड, मोहरा आणि पुतळ्यांच्या माळा, हायकोल, चिंचपेटी व पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, कंबरपट्टा असे पारंपरिक दागिन्यांनी सजविण्यात आले होते. देवाचा शिणवटा घालवण्यासाठी रात्री गवतीचहासह विविध प्रकारचे १५ ते १६ आयुर्वेदिक पदार्थांचा काढा झोपण्यापूर्वी दिला जातो. या काढ्यामुळे देवाला पूर्ण विश्रांती मिळून चांगली झोप लागते, असे मानतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या पूजेनंतर देवाचे नित्योपचार पुन्हा सुरू झाले आहेत. असे असले तरी प्रक्षाळपूजेआधी आणि नंतर सगळे विधी पार पडत असताना देवाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत जातात आणि आलेला शिणवटा जाऊन पुन्हा चेहरा प्रसन्न दिसू लागतो, अशी भावना वारकऱ्यांची आहे.