परभणी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुका एकत्रित लढण्यात याव्यात अशा नेतृत्वाकडून सूचना आहेत, परंतु काही स्थानिक कारणाने असमन्वय झालाच तर गरज पडल्यास स्वतंत्र लढायचीही आमची तयारी आहे. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचीही तयारी असू द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांनी शनिवारी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यां बैठकीत विटेकर यांनी स्वबळाचा मुद्दा भाषणात उपस्थित केला.

काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याचा मनोदय व्यक्त केला होता. महायुतीतील पक्ष हे स्वबळाची भाषा करत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. आज विटेकर यांनीही हाच मुद्दा आपल्या भाषणात अधोरेखित केला. २०१४ या वर्षी जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व परभणी महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती. आता पुन्हा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकेल असा विश्वास यावेळी विटेकर यांनी व्यक्त केला.

जे कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष कार्य करतील व आपापल्या भागात पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशांनाच पदे दिली गेली पाहिजेत. वेगवेगळ्या समित्यांवर अशाच कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारी देताना अशाच कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असेही यावेळी विटेकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्या तर अडीच वर्षांनी होणाऱ्या मंत्रिमंडळ बदलात आमदार विटेकर यांना मंत्रिपद मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हक्काने जाता येईल या साठी कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात मजबूत पक्षबांधणी करावी, असे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी चंद्रकांत राठोड, नानासाहेब राऊत, भावनाताई नखाते आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीस पक्षाचे मराठवाडा समन्वयक आमदार विक्रम काळे यांनी मोबाइलद्वारे भाषण केले. मंगळवारी पुणे येथे होणाऱ्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.