सोलापूर : जिल्ह्याची सीमा कर्नाटक, तेलंगण राज्याला लागून आहे. तेलुगू भाषकांशी सुमारे दोनशे वर्षांपासून सोलापूरची नाळ जोडली गेली आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या पंढरपूरसह अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज देवस्थान, सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरासह शेजारच्या तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, गाणगापूरचे दत्तात्रेय मंदिर अशा अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांसह ऐतिहासिक, कृषी आणि वैद्याकीय पर्यटनासाठी सोलापूरचे नाव जगाच्या नकाशावर नावारूपाला आले आहे. सिंचनाच्या वाढत्या सोयींमुळे साखर उद्योगासह फलोत्पादनाचा होणारा विस्तार, दळणवळणाचा विकास, अन्य पायाभूत सुविधा यामुळे सोलापूर जिल्ह्याने विविध क्षेत्रांत प्रगती केली.
एकेकाळी मुंबईच्या पाठोपाठ कापड गिरण्यांमुळे राज्यात चौथ्या क्रमांकाचे औद्याोगिक शहर म्हणून लौकिक मिळवलेल्या सोलापूरने (महापालिका स्थापना १९६४) उच्चतम गुणवत्तेची, प्रसिद्ध सोलापुरी चादर आणि टॉवेल उत्पादनात मोठी बाजारपेठ मिळविली. यातून हे शहर हातमाग आणि यंत्रमाग, विणकाम उद्याोगाचे माहेरघर बनले खरे; परंतु काळानुसार बदलास सामोरे जाण्यात येथील कारखानदार मागे पडले. त्यामुळे सोलापुरी चादरीचे उत्पादन घटले. मात्र, निर्यातक्षम टॉवेल उत्पादनात मोठी भरारी घेतली. सुमारे ६० हजार महिला कामगारांना रोजगार देणारा विडी उद्याोग कसाबसा टिकून आहे. फॅक्टरी अॅक्टखाली नोंदणी झालेल्या व सध्या सुरू असलेल्या ३९२६ कारखान्यांमध्ये ६८ हजार ९२५ कामगार काम करत आहेत.
फलोत्पादनात आघाडी
● जिल्ह्यात सिंचनाच्या सोयीमुळे आमूलाग्र बदल होऊन फलोत्पादनासह साखर कारखानदारीचे जाळे निर्माण झाले. सध्या या जिल्ह्यात सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन होते. सांगोल्याचे उच्च प्रतीचे डाळिंब, करमाळ्यातील दर्जेदार केळी व अन्य फळांचे वाढलेले बागायती क्षेत्र हे सोलापूरचे बलस्थान ठरले आहे. मात्र शेतमाल निर्यातीसाठी ग्रेडिंग आणि पॅकेजिंग युनिट, गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळा, शीतगृहे आदी पायाभूत सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
● राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रानंतर आता केळी क्लस्टर विकास कार्यक्रम मंजूर होण्यासाठी पाठपुरावा अपेक्षित आहे.
● मंगळवेढा ज्वारीचे कोठार मानले जाते. येथील मालदांडी ज्वारीला ‘जीआय’ (भौगोलिक मानांकन) मिळाले आहे. ज्वारीसह मका, बाजरी यांसारख्या भरड धान्याच्या वाढीव उत्पादनासाठी दोन वर्षांपूर्वी सरकारने सोलापूरसाठी श्री उत्कृष्टता केंद्र मंजूर केले होते. त्याची प्रतीक्षा आहे.
●उजनी परिसरात सुमारे १८० कोटी रुपये खर्च करून जलपर्यटन प्रकल्प उभारण्यास शासनाने मान्यता देऊन त्याची निविदाही काढली होती. पर्यटन विकासाला अधिक चालना देणारा हा प्रकल्पही अचानक स्थगित झाला आहे. ही उणीव दूर होण्याची अपेक्षा आहे.
● उजनी धरणासह सर्व सिंचन पायाभूत सुविधांच्या परिचालन आणि देखभालीसाठी पाणी वापर संस्था निर्माण होणेही अपेक्षित आहे. कृषी, औद्याोगिक निर्यातीसह उत्पादित मालाचा राष्ट्रीय पुरवठा साखळीचा विकास सुलभ होण्यासाठी येथील भौगोलिक स्थिती पाहता ड्रायपोर्ट विकासाची मागणी रास्त ठरते.
● वाराणसीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूरसाठी सुमारे २३०० कोटी खर्चाचा कॉरिडॉर आराखडा मंजूर करून त्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. स्वामी समर्थांच्या अक्कलकोटचाही कायापालट होत आहे.
दृष्टिक्षेपात सोलापूर
जिल्हाभौगोलिक क्षेत्रफळ – १४८९५ चौरस किलोमीटर (राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ४.८४ टक्के) ।
तालुके-११ ।
ग्रामपंचायती- १०२८ ।
महानगरपालिका- १।
नगर परिषदा-११।
नगर पंचायती- ६ ।
विद्यापीठ-१ ।
लोकसंख्या – २०११ च्या जनगणनेनुसार ४३.१८ लाख (६७.६० टक्के ग्रामीण, ३२.४० टक्के नागरी) ।
एकूण साखर कारखाने – ३७ ।
ऊस गाळप – एक कोटी ४० लाख ४०७६ टन, ।
साखर उत्पादन : ८८ लाख २८ हजार ७७६ क्विंटल ।
इथेनॉल निर्मिती- १,२४, ३२५ हजार लिटर, ।
सहवीजनिर्मिती-१३५४.७२ किलो वॅट ।
मद्यार्क निर्मिती-४१६५ हजार लिटर.