सातारा : माझ्या काही विधानांतून माध्यमांचे काही प्रतिनिधी माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यातून त्यांचीच प्रतिमा ढासळत असल्याचे मत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी येथे बोलताना सांगितले.कोकाटे महाबळेश्वर दौऱ्यावर आले असून, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील मतप्रदर्शन केले. कोकाटे म्हणाले, की मी एक सर्वसामान्य शेतकरी कार्यकर्ता आहे. माझ्या बोलण्यामध्ये पारदर्शकता आहे. त्यामध्ये खोटेपणा नाही. कोणताही स्वार्थ नाही. त्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींनी माझी प्रतिमा किंवा माझे म्हणणे प्रसिद्ध करताना त्यावेळी मी काय काय बोललो आहे. कोणत्या अनुषंगाने शेतकरी भाषेमध्ये एखादे वक्तव्य केले आहे. हे विचारात घेतले जात नाही.

मी संपूर्ण काय बोललो आहे. तेही लिहिणे, दाखवणे गरजेचे आहे. केवळ त्यातील दोन-तीन वाक्य घेऊन त्यालाच जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न काही माध्यमांच्या प्रतिनिधींकडून केला जातो. मात्र, त्यांनी याबाबत तात्पुरती प्रसिद्धी मिळवताना त्यांची ही प्रतिमा खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला कोकोटे यांनी दिला. मुळात मी शेतकरी कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मला पूर्ण माहिती आहेत. त्याची उत्तरे मला माहिती आहेत. लोकांसमोर सत्य मांडणे कधीही चांगले असते. मी जर काही चुकीचे बोललो असेन तर ते म्हणणे विचारात घ्यायला वरचे लोक आहेत ना. मी चुकीचं बोललो तर ते माझं चुकीचं काय होतं का? हे विचारात घेऊन ते सरळ करतील ना. चूक सुधारतील ना. मी आता माध्यमांशी बोलणे टाळतो. मी शक्यतो माध्यमांशी कोणत्याही विषयावर बोलत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्ट्रॉबेरीच्या हमीभावाबाबत केंद्राकडे बोट

महाबळेश्वर परिसरात देशातील सर्वांत जास्त स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा हंगामाच्या शेवटी स्ट्रॉबेरीला अत्यल्प २५ ते ३० रुपये किलो भाव मिळाला. त्यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला हमीभाव कधी मिळणार, याबाबत विचारले असता कोकाटे म्हणाले, हमीभाव निश्चितीचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. केंद्र सरकारकडून हे हमीभाव निश्चित केले जातात. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन केंद्र सरकारशी बोलणे करता येईल. याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल.