लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांचा धडाका सध्या सुरु आहे. या अनुषंगानेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी राहुरीत सभा पार पडली होती. यावेळी सभेत बोलताना शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खोचक टीका करताना विठ्ठलराव विखे पाटील यांच्यानंतरच्या पिढय़ांनी काय दिवे लावले?, असा निशाणा साधला होता.

या टीकेला आता राधाकृष्ण विखे यांनी प्रत्युत्तर देत शरद पवार यांनी नगर जिल्ह्याचे कसे वाटोळे केले हे त्यांना पटवून देवू, जिल्ह्याच्या विकासाबाबत आपली खुली चर्चा करण्याची कधीही तयारी आहे. या चर्चेत त्यांनी जिल्ह्याचा विकास कसा होऊ दिला नाही, याबाबत आपण त्यांना पटवून देऊ, असे आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

हेही वाचा : महायुतीचा नाशिकच्या जागेवरील तिढा सुटला, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी

राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?

“आम्ही काय विकास केला हे शरद पवार यांना माहिती नसेल. त्यांना आता विस्मरणाचा परिणाम झाला असेल. बाळासाहेब विखे पाटील यांना लोकांनी आठ वेळा निवडून दिले. मग काम केल्याशिवाय लोकांनी निवडून दिले का? मीदेखील सात वेळा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलो आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर माझे त्यांना खुली चर्चा करण्याचे आव्हान आहे. नगर जिल्ह्याचे वाटोळे कसे केले. जिल्ह्याचे पाणी कसे गेले, जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प का येवू शकला नाही. औद्योगीकरण, शेती क्षेत्रासह कोणतेही क्षेत्र असो, या जिल्ह्यासाठी शरद पवार यांनी काय योगदान दिले त्यांनी जाहीर करावे. आज आप्पासाहेब पवार नाहीत. पण याचे उत्तर त्यांनी दिले असते”, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार काय म्हणाले होते?

“लोकसभच्या निवडणुकीत मोदी गॅरंटीचा मोठा गवगवा करण्यात येत आहे. मात्र, ही गॅरंटी टिकणारी नाही. त्यांच्या गॅरंटीचा चेक वटत नाही. हे सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करत आहेत”, अशी टीका शरद पवार यांनी केली होती. तसेच ते पुढे म्हणाले होते, “विठ्ठलराव विखे-पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला. मात्र, विठ्ठलराव विखे यांच्यानंतरच्या पिढय़ांनी काय दिवे लावले? कोणताच विकास केलेला नाही”, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली होती.