राहाता : जिल्ह्यात पावसाने झालेल्या नुकसानीचा स्थायी आदेशाच्या पलीकडे जावून मदतीचा विचार असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. जास्तीतजास्त नुकसान भरपाई देण्याचा सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी देतानाच सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले.
तालुक्यातील बाभळेश्वर, राजुरी ममदापूर, तिसगाववाडी, अस्तगाव येथे चक्रीवादळसदृश पावसाने डाळिंब, आंबा, ऊस आणि साठवलेल्या कांद्याचे तसेच घरांवर व गोठ्यांवर झाडे पडून नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाला विखे यांनी आज सोमवारी भेटी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. सरकार नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही दिली. झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ वापरा, अशा सूचना विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्री विखे यांनी भाऊसाहेब विनायक म्हस्के यांची कांदाचाळ, डाळिंब उत्पादक राहुल सुरेश कसाब आणि डाळिंबरत्न बी. टी. गोरे यांच्या डाळिंब बागेच्या नुकसानीची पाहणी केली. प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पाहणी दरम्यान विखे यांनी डाळिंब उत्पादकांशीही संवाद साधला. राहुल कसाब यांची फळबाग पूर्णपणे भुईसपाट झाली आहे, या बागेची पुन्हा बांधणी करण्यासाठी काय करता येईल, याविषयी डाळिंबरत्न डाॅ. बी. टी. गोरे यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आंबा, कांदा उत्पादकांना देखील या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. चाळीत असलेला कांदा आणि त्यावर पडलेल्या झाडांमुळे पूर्णपणे भिजलेल्या कांद्याचे पंचनामे करून अहवाल त्वरित पाठवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
वीजपुरवठा सुरळीत करा
मंत्री विखे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत ज्या ठिकाणी पंचनामे करण्यास अडचणी आहेत, मदत देण्यात अडचणी आहेत, यासंदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी बोलून नुकसान भरपाई कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. वादळाने वीजपुरवठा दोन दिवसांपासून बंद आहे. तो तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणने प्रयत्न करण्याचे निर्देश विखे यांनी दिले. आपत्ती नैसर्गिक असली तरी, भविष्यात नुकसान कसे टाळता येईल, यावर उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.