“देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून, या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पार्टी बिथरली आहे. राहुल गांधींच्या टी शर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागत असून, यातूनच ‘भारत जोडो यात्रे’मुळे भाजपाला धडकी भरली आहे, हे सिद्ध होत आहे. राहुल गांधी यांच्या टी शर्टची चिंता करण्यापेक्षा देशाच्या १३० कोटी जनतेला उघड्यावर आणणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारची घटका भरत आली आहे त्याची चिंता भाजपाने करावी.” अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

हेही वाचा : “१२ कोटींची कार, १० लाखांचा सूट आणि दीड लाखांचा चष्मा असलेल्या बनावट फकीराला टी-शर्टचा त्रास!”

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने कन्याकुमारी येथून बुधवार ( ७ सप्टेंबर ) या पदयात्रेचा आरंभ झाला. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या वेळी राहुल गांधी यांच्या हाती तिरंगा ध्वज सोपावला. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी ३५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. मात्र, आता यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवरून त्यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. या टीकेला काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. काँग्रेसचे नेते देखील पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत.

Rahul Gandhi’s T-shirt row :भाजपा अजून खाकी चड्डीतून बाहेर येत नाहीये –भूपेश बघेल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, “काँग्रेस संपली, राहुल गांधी यांना भाजपा महत्व देत नाही असे म्हणणारे भाजपाचे डझनभर नेते, प्रवक्ते, मंत्री राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी व त्यांची बदनामी करण्यासाठी अहोरात्र झटत असताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु करताच भाजपाच्या नेत्यांची कोल्हेकुई सुरु झाली. कारण या यात्रेला जनतेचाच प्रतिसाद मिळत आहे. जनतेचे प्रश्न घेऊन त्यांच्याशी संवाद साधत राहुल गांधी देश पिंजून काढत आहेत. १५० दिवस ३५०० किमीचा प्रवास व १२ राज्यातून ही यात्रा जाणार आहे. सुरुवातीलाच भाजपाला भारत जोड़ो यात्रेची इतकी भीती वाटू लागली आहे. यात्रा जसजशी पुढे जाईल तसा मिळणारा प्रतिसाद भाजपाचे डोळे दिपवणारा असेल. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर राहुल गांधी थेट केंद्र सरकारला जाब विचारत असून जनतेचे हे प्रश्नच महत्वाचे आहेत हे लोकांच्या प्रतिसादावरून दिसून येते.”

…असा फकीर आपल्या देशाला लाभला आहे, याचे भान भाजपाने तरी ठेवायला हवे –

“राहुल गांधी यांच्या टी शर्टची किंमत दाखवणाऱ्या पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी तर १० लाखांचा सुट, १.५ लाखांचा चष्मा, ८० हजाराची शाल, १२ लाखांची कार, ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरतात आणि वरून मी फकीर आहे असा कांगवा करतात. असा फकीर आपल्या देशाला लाभला आहे याचे भान भाजपाने तरी ठेवायला हवे. “, असंदेखील पटोले यांनी म्हटलं आहे.