अहिल्यानगरः मे महिन्यातील पावसाने, जिल्ह्यात गेल्या २३ दिवसांत एकूण १७ हजार ७८८ शेतकऱ्यांचे ९२६७.०३ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून मिळाली. शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सर्वाधिक नुकसान हे मंगळवार व बुधवार या दोन दिवशी झालेल्या अतिवृष्टीने झाले. मंगळवारी ६०८५ शेतकऱ्यांचे ३६१७.५५ हेक्टर क्षेत्रावर तर काल, बुधवारी ६६८८ शेतकऱ्यांचे ३५२५.५६ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान अहिल्यानगर तालुक्यात झाले. जिल्ह्यात एकूण १७१ गावांना अवकाळीचा फटका बसला. त्यामध्ये ४५ गावे एकट्या अहिल्यानगर तालुक्यातील आहेत. याशिवाय पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यात नुकसान झाले आहे. तुलनेत जिल्ह्याच्या उत्तर भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे नुकसानीचे प्रमाणही कमी आहे.

या पावसाने प्रामुख्याने कांदा, मिरची, टोमॅटो, भुईमूग, चारापिके, मका, भाजीपाला, फुलशेती, साठवणूक केलेला कांदा, बाजरी तसेच केळी, डाळिंब, आंबा यांच्या फळबागा. टरबूज, कलिंगड, पपई आदीचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील मे महिन्याच्या सुरुवातीला पाच दिवस पाऊस नव्हता. त्यानंतर मात्र रोज सातत्याने पावसाची हजेरी सुरू आहे. गेल्या २३ दिवसांत १२४ मंडळातून एकूण २२०.३ मिमी. पाऊस झाला. मे महिन्यातील हा उच्चांकी पाऊस आहे. यातील सर्वाधिक पाऊस कोळगाव मंडळात ४७१, भांबोरामध्ये ४४२.९, माहीमध्ये ४४७.१, खेडमध्ये ४५२, चासमध्ये ४३२.८, पेडगावमध्ये ४३२ मिमी. पाऊस झालेला आहे तर ३१ मंडळामध्ये ३०० ते ४०० मिमी. दरम्यान पाऊस झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंचनाम्याचा रोज आढावा

सर्वाधिक नुकसान झालेल्या अहिल्यानगर तालुक्यामध्ये नुकसानीच्या पंचनामेसाठी १८५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये महसूल विभागाचे ७५, ग्रामविकास विभागाचे ५३ व कृषी विभागाच्या ४५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर १० नोडल अधिकारी व त्यावर नियंत्रणासाठी निवासी नायब तहसीलदार गौरव दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचनामे तातडीने होण्यासाठी रोजच्या रोज आढावा घेणार असल्याचे प्रांताधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय शिंदे यांनी सांगितले. नुकसान झालेल्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी स्वतःहून ग्रामसेवक व तलाठ्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे. शेती पशुधनाशिवाय घर, सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे १ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.