सांगली : आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी पावसाचे पुनरागमन झाले असून, गुरुवारी पहाटे सांगली, मिरज शहरात पावसाच्या सरी कोसळल्या, तर दुपारनंतर कर्नाटकच्या सीमावर्ती गावात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४.८ मिलिमीटर पाऊस झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे.

गेले आठ दिवस पावसाने दडी मारली होती. खंडित स्वरूपात काही ठिकाणी पाऊस झाला असला, तरी उन्हाची तीव्रताही वाढली होती. आठ दिवस मिळालेल्या उघडिपीमुळे काही शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या पेरण्याही सुरू केल्या आहेत. गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून सांगली व मिरज शहरासह परिसरात हलका पाऊस झाला. मात्र सूर्योदयानंतर पावसाचे वातावरण बदलले. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच सायंकाळी ढगांच्या कडकडाटासह पावसाळी वातावरण तयार झाले. कर्नाटक सीमेवर असलेल्या म्हैसाळ, नरवाड, आरग, खटाव, लिंगनूर परिसरात सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसाने नाले भरून वाहू लागले असून, रानात पाणीही साचले आहे. खरीप पेरणी झालेल्या रानात पावसाने दडपा पडल्याने उगवण होण्यात अडचणी निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४.८ मिलिमीटर पाऊस झाला असून, तालुकानिहाय नोंदला गेलेला पाऊस असा – मिरज- २.९, जत- २.८, खानापूर- ४.१, वाळवा- ५.६, तासगाव- ६.३, शिराळा- ७.६, आटपाडी- ३.५, कवठेमहांकाळ- ४.४, पलूस- ४.५ आणि कडेगाव- ८.२ मिलिमीटर.