मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा कर्जतमध्ये पार पडला. त्यावेळी त्यांनी सहकार चळवळीवर राज ठाकरेंनी भाष्य केलं. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी आत्ताच्या महायुतीच्या सरकारवरही आपल्या ठाकरी शैलीत टीका केली. महाराष्ट्रात सहकार चळवळ अनेक वर्षांपासून उभी राहिली आहे. त्याबाबत बोलताना त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

“महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून सहकार चळवळ उभी राहिली आहे. मात्र आत्ताचं सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही. ती ‘सहारा’ चळवळ आम्ही अडकलो आहोत आम्हाला सहारा द्या. ती ही सहकार चळवळ नाही. सगळ्यांनी मिळून सरकार चालवायचं म्हणजे सहकार चळवळ नाही.” असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.

सहकार चळवळ महात्मा फुलेंनी उभी केली आहे

तसंच राज ठाकरे पुढे म्हणाले, सहकार चळवळ ही महात्मा फुलेंनी उभी केली आहे. त्यांनी शिक्षणाची चळवळ उभी केली. त्यावेळी महाराष्ट्रातल्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये म्हणून पहिलं आंदोलन ज्योतिराव फुलेंनी केलं. इंग्रज लोक दख्खन राईट म्हणायचे. पुण्यात डेक्कन जिमखाना आहे तो मूळ शब्द दक्षिण आहे. त्याचा झाला दख्खन आणि मग इंग्रज आल्यावर शब्द झाला डेक्कन. महाराष्ट्रात २ लाखांवर सहकारी संस्था आहेत. त्यानंतर येतो तो गुजरातचा नंबर ज्याचा महाराष्ट्रावर डोळा आहे. महानंद डेअरी अमूल गिळकृंत करणार का? अशी स्थिती निर्माण झाली आहे असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

हे पण वाचा- “राज ठाकरे हिंदू शेर, त्यांनी अयोध्येला..”; हनुमान गढीचे महंत राजूदास यांनी केलं राज ठाकरेंचं कौतुक

महाराष्ट्रात राजकीय स्वार्थ म्हणून…

महाराष्ट्रातली सहकारी चळवळ सांभाळण्यासाठी अत्यंत सक्षम माणसं महाराष्ट्रात आहेत. भविष्यातही ती माणसं तयार होतील. मात्र इतिहासाकडे आपण दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्याचं भान आपल्याला वर्तमानात येणार नसेल तर नंतर काहीही होणार नाही. राजकीय स्वार्थ म्हणून मराठवाड्यात साखर कारखाने केले जात आहेत. तिथे पाणी लागत नाही तरीही हे केलं जातं आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालानुसार पुढच्या ४० ते ५० वर्षात मराठवाडा वाळवंट होईल असं म्हटलं आहे. हे आमच्या पुढाऱ्यांना समजत नाही. जे मिळतंय ते ओरबाडा, पुढच्या पिढीच्या घशात घाला असं चाललं आहे. कुणीही पुढचा विचार करत नाहीये असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जात-धर्माच्या नावावर मराठी माणसांना लढवलं जातं आहे

आज आम्ही आमच्या आमच्यात भांडतो आहोत. कुणी मराठा, कुणी कुणबी, कुणी ब्राह्मण हे काय चाललंय? हे सगळं चालवलं जातं आहे. मराठी माणूस एकत्र राहू नये म्हणून बाहेरच्या लोकांचे प्रयत्न सुरु आहेत पण आपल्या लोकांना ते कळत नाही. जे महाराष्ट्राचं चांगलं आहे ते बाहेर काढा, बाहेर निघत नसेल तर उद्ध्वस्त करा असं धोरण राबवलं जातं आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आज जगात जेवढी युद्ध झाली त्यांचा इतिहास हा भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही. हा भूगोल म्हणजे जमीन हे लक्षात घ्या. कुठलंही युद्ध म्हणजे काय तर जमिनीचा ताबा घेणं. जमिनीचा ताबा घेणं याला आपण इतिहास म्हणतो. महाराष्ट्र आज इतका बेसावध आहे. पूर्वी लढाया तरी होत होत्या आता राजकीय दृष्ट्या इतक्या हळूहळू पद्धतीने जमिनी घेतल्या जात आहेत की पुढे काही अस्तित्व राहणार नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.