रत्नागिरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना रामदास कदम यांनी मला राष्ट्रवादीत घेवून कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याची विनंती केली होती. मी त्यांच्या पाया पडत नाही तर ते माझे पाय धरतात. रामदास कदम हे वाघ नाहीत तर बिबट्या आहेत. अशी घाणाघाती टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली. गुहागर वेळणेश्वर येथील जिल्हापरिषद गटातील मेळाव्यात ते बोलत होते.

वेळणेश्वर जि.प. गटातील हेदवी हेदवतड येथील खारवी समाज भवन येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी आ. भास्कर जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकारी व विशेष करुन रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी आमदार जाधव यांनी रामदास कदम माझ्या दोनवेळा पाया पडल्याचे ही सांगितले.ते म्हणाले, मी राष्ट्रवादीत असताना रामदास कदम मला तुमच्या पक्षात घ्या व कॅबिनेट मंत्रीपद मिळवून द्या. तसेच माझ्या मुलगा योगेशला पदरात घ्या अशी विनवणी करत कदम माझ्या पाया पडले आहेत. अशा रामदास कदमांनी यापुढे माझ्याविरोधात बोलताना विचार करावा, असा इशाराच जाधव यांनी दिला.

आमदार जाधव म्हणाले, वेळणेश्वर व पडवे गटातील गेलेले नेत्रा ठाकूर व महेश नाटेकर हे पदाधिकारी केवळ स्वार्थासाठी गेले आहेत. नेत्रा ठाकूर यांना जिल्हा नियोजन मंडळावर जायचे असल्याने त्यांनी हा खटाटोप केला असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय वेळणेश्वर गटात पुरुष आरक्षण असताना त्यांनी या गटात दावेदार उमेदवार असलेल्या विलास वाघे व समीर डिंगणकर यांनादेखील आपल्याबरोबर पक्षप्रवेश घडवून त्यांना संपवले असल्याचे जाधव सभेत सांगितले.

२०१७ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना ठाकूर यांना मीच नियोजन मंडळावर घेतले होते. आपण वेळणेश्वरची खोती संपवली म्हणून आज मला संपविण्याचा करत आहेत. कुणाचा बाप आला तरी मी संपणार नाही उलट मीच त्यांना संपवेन, असा इशारा आ. जाधव यांनी विरोधकांना दिला.

ते म्हणाले, वेळणेश्वर येथील खारवी सभागृह पाडण्यासाठी नवनीत ठाकूर यांनी त्यावेळी संबंधित विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. आता सीआरझेडच्या नियमावलीमुळे हे सभागृह पाडण्याची नोटीस आली असून ते वाचविण्यासाठी मीच उपयोगी येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. साखरीआगर जेटीसाठी साडेआठ कोटीचा निधी मी मंजूर करुन आणला आहे. तिचे बांधकाम मीच पूर्णत्वास नेणार आहे. वेळणेश्वर गटातील धूपप्रतिबंधक बंधारे वा रस्ते गटातील धूपप्रतिबंधक बंधारे वा रस्ते असोत ही कोटीची कामे मीच मंजूर करुन आणली असून ही कामे थांबवायला मला वेळ लागणार नाही. तुमची गाठ माझ्याशी आहे हे विसरु नका, असा इशारा त्यांनी दिला.

पडवे मोहल्ल्यात रस्ता जाण्यासाठी कोणीही जागा देत नव्हते. मात्र, मी तेथील हिंदू लोकांच्या विरोधात जाऊन तेथील रस्ता करुन दिला. आपण गुहागरमध्ये पहिल्यादा आलो तेव्हा येथे असा कोणता विकास होता हे मला सोडून जाणाऱ्यांनी सांगावे, येथील विकास हा केवळ माझ्यामुळेच झाला आहे, असेही आ. जाधव यांनी यावेळी सांगितले. यावेळी सभेला जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, तालुकाप्रमुख सचिन बाईत, अरुणा आंब्रे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.