संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेले आहेत. दरम्यान या प्रकरणी नेमकं गुन्हा घडताना काय झालं त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सगळ्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर सदन चालू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

काय म्हणाले रोहीत पवार?

गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या शरीरावर लघुशंका केली. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण दोन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे हे फोटो आले असावेत. तरीही धाडसी निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्हाला मन आहे का? असा प्रश्न आम्हाला पडला. धनंजय मुंडेंचा राजीनामा हा आजच्या आज घेतलाच पाहिजे. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे हे जगाला माहीत आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची पाठराखण करु नका हे मला सांगायचं आहे असं रोहीत पवार म्हणाले.

अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे-रोहीत पवार

अजित पवार यांनी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे. पंकजा मुंडेंनाही माझी विनंती आहे की मीडियासमोर या, तुमची भूमिका मांडा. आज जर थोरले मुंडे म्हणजेच गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने फोडून काढलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता. आज सरकारने जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही कामकाज चालू देणार नाही. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या सरकारला माफ करणार नाही. संतोष देशमुख प्रकरणाला काही लोक जातीय रंग देत आहेत. पण ते कुठल्याही जातीचे किंवा धर्माचे असते तरीही महाराष्ट्र असाच पेटून उठला असता. कारण अत्यंत क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माणुसकी जपली पाहिजे असं सरकारला वाट नाही-रोहीत पवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो दोन महिन्यांपूर्वी आले आहेत. माणुसकी जपली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांना वाटत नाही का? सरकार जपत आहात, मैत्री जपत आहात, राजकारण जपत आहेत पण माणुसकी जपत नाही ही बाब दुर्दैवी आहे असं रोहीत पवार म्हणाले. या सगळ्या प्रकरणात खोलात जाऊन शोध घेतला तर धनंजय मुंडेंनी कुणाची पाठराखण केली आहे हे समजू शकेल. जर मंत्रीच तो व्यक्ती असेल तर कुठला पोलीस काम करणार आहे? असाही प्रश्न रोहीत पवार यांनी विचारला आहे.