हर्षद कशाळकर अलिबाग : गेल्या वर्षीच्या महापुरानंतर महाड परिसरातील नद्यांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पावसाळय़ापुर्वी ४० टक्के गाळ काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. पर्यावरणविषयक परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने गाळ काढण्याचे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण होऊ शकलेले नाही. आता पावासाळा सुरु झाल्याने गाळ काढण्याची कामे थांबविण्यात आली आहेत. महाड, पोलादपूर आणि महाबळेश्वरच्या खोऱ्यात २३ आणि २४ जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टी झाली. दोन दिवसात १ हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडला. यामुळे सावित्री आणि गांधारी नद्यांना भीषण पूर आला. महाड शहर आणि लगतच्या परिसराला महापूराचा वेढा बसला. शहराला जोडणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे हजारो नागरिक अडकून पडले. शहरात दहा ते बारा फूट पाणी शिरले. संपूर्ण बाजारपेठ पुराच्या पाण्याखाली गेली. घरांचे, कार्यालयांचे, बँकांचे, व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झाले. महाडकरांना पूर काही नवीन नाही. पण हा पूर अभूतपूर्व आणि विध्वसंक होता. पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळे पुराची दाहकता महाडकरांनी यंदा अनुभवली होती. त्यामुळे सावित्री नदीतील गाळ काढण्याची मागणी महाडकरांनी लावून धरली होती. यानंतर जलसंपदा विभागामार्फत या सावित्री, काळ, गांधारी, भावे नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने गाळाचे सर्वेक्षणही केले होते. यात नद्यामध्ये अंदाजे २६ लाख ५० हजार घनमीटर गाळ साचला असल्याचे समोर आले होते. यापैकी १० लाख ५ हजार घनमीटर गाळ काढण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश आले आहे. अद्यापही १५ लाख ९१ हजार घनमीटर गाळ नदी पात्रात शिल्लक आहे. म्हणजेच गाळ काढण्याचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून ६० टक्के काम शिल्लक आहे. पावसाळा सुरू झाल्याने आता सर्व ठिकाणची गाळ काढण्याची कामे थांबविण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित गाळ काढण्यासाठी महाडकरांना सहा महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे. नदी पात्रातील गाळ क्षेत्र काही टप्प्यात सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने त्या ठिकाणचा गाळ काढण्यासाठी पर्यावरण विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. त्या मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे सीआरझेड क्षेत्रातील गाळ काढता येऊ शकलेला नाही. या परवानग्या वेळेत मिळाल्या असत्या तर उर्वरित गाळ काढण्याची कामेही पावसाळय़ापूर्वी उरकता आली असती. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अँथॉरिटीकडून सीआरझेड क्षेत्रात येणारी गाळाची बेटे काढण्याची परवानगी मे महिन्याच्या उत्तरार्धात प्राप्त झाली होती. त्यामुळे १५ दिवसात जितका शक्य होऊल तितका गाळ काढण्यात आला आहे. पावसाळय़ापूर्वी नदीपात्रातील सर्व गाळ निघेल अशी महाडकरांना आशा होती. मात्र गाळय़ाचे प्रमाण, पर्यावरणविषयक परवानग्या मिळण्यास झालेला उशीर यामुळे हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. महाड येथील पूर निवारणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध पातळय़ांवर कामे सुरू आहेत. यात नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामाचाही समावेश आहे. आत्तापर्यंत १० लाख ५९ हजार घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. यात सिआरझेड क्षेत्रात मोडणाऱ्या भागातील ८ हजार १०० घन मीटर गाळाचा समावेश आहे. उर्वरित गाळ काढण्याचे काम पावसाळय़ानंतर केले जाईल. गाळ काढण्यासाठी ९ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी रायगड