संगमनेर : नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी भरीव निधी आणण्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियानांतर्गत संगमनेर नगरपालिकेला नवीन ‘मिनी रेस्क्यू अग्निशमन वाहन’ मिळाले. त्याचा लोकार्पण सोहळा आमदार खताळ यांच्या हस्ते पार पडला.
माजी नगरसेवक श्रीराम गणपुले, जावेद जागीरदार व ज्ञानेश्वर कर्पे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे, शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, रामभाऊ जाजू, सौरभ देशमुख, विकास पुंड, विकास डमाळे, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. अपघात घडल्यास अशा वाहनांची गरज भासते. आता हे वाहन वेळेवर पोहोचून नागरिकांना मदत मिळू शकेल.
शहरातील विकासकामात अनेक अडथळे येतात, काहीजण अफवा पसरवतात. मात्र, मी त्याकडे दुर्लक्ष करतो. केंद्र, राज्य व तालुक्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे तुम्हाला कोणाकडूनही त्रास होणार नाही. नगरपालिकेत लोकांची कामे झाली पाहिजेत, यासाठी नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा. काही माजी नगरसेवक अजूनही सत्ता असल्याच्या थाटात वागत आहेत, यावर मुख्याधिकाऱ्यांनी उपाय करावेत, असे आवाहन आमदार खताळ यांनी केले. नव्याने दाखल झालेल्या गुरखा या अग्निशमन वाहनाची माहिती मुख्याधिकारी कोकरे यांनी दिली. सूत्रसंचालन राजेश गुंजाळ यांनी केले. आभार प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी मानले.