Sanjay Raut on Mahavikas Aghadi : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत समन्वय नसल्याची चर्चा सातत्याने समोर येत आहे. जागा वाटप विलंबाने झाल्याने आणि योग्य जागा वाटप न झाल्याने महाविकास आघाडीचा राज्यात पराभव झाला असं गणित मांडलं जातंय. यावरून आता महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. शरद पवारांनीही महाविकास आघाडीत समन्वयाच्या अभावामुळे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. तर, विजय वडेट्टीवार यांनीही विधानसभेच्या परभवाला जागावाटपाला कारणीभूत ठरवलं आहे. आता संजय राऊतांनीही या विषयी वक्तव्य केलंय. महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचंही त्यांनी मान्य केलं.

जागा वाटप विलंबाने झाले, त्यामुळे अस्वस्थता पसरली. कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळला नाही, अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “विजय वडेट्टीवार यांची वेदना ही संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्या आहेत आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागावाटप झालं. तेव्हाही आम्ही सांगत होतो. पण आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. नाना पटोले आणि माझ्यात वाद सुरू होता. पण वाद त्या पद्धतीचा नव्हता. जागा वाटपाला विलंब झाला, हाच मुद्दा आहे.”

हेही वाचा >> “जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत”, ‘त्या’ दोन नेत्यांकडे बोट दाखवत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

“या जागा वाटपात वडेट्टीवार होतेच. त्यांनी विदर्भातील जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सोडल्या असत्या तर बरं झालं असतं. कारण त्या जागा ते हरले आहेत. चंद्रपूरची जागा किशोर जोरगेवार राष्ट्रवादीतून लढणार होते. यासाठी १७ दिवस राष्ट्रवादीने प्रयत्न केले. पण काँग्रेसने ही जागा सोडली नाही. अखेर किशोर जोरगेवार भाजपात गेले आणि जिंकले. काही लोकांना वाटत होतं की आम्हीच जिंकू. आम्हाल जागा मिळायला पाहिजे. देशातील वातावरण बदललं आहे, वगैरे”, असं म्हणत संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली.

“लोकसभा निवडणुकीतील विजय वेगळा आहे, त्यामुळे सत्ताधारी पक्ष सावध झाला आहे. (विधानसभेच्या पराभवाला) याला सगळेच जबाबदार आहेत. कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही आग्रहाने मागत होतो. आम्ही ६ वेळा जिंकलो आहोत, ही जागा आमच्याकडे आली असती तर आम्ही जिंकलो असतो. अशा अनेक जागा आहेत. प्रत्येकाला आपआपल्या जागा हव्या होत्या, पण त्या चर्चा सकारात्मक होऊ शकल्या नाहीत. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने म्हणावा तसा हस्तक्षेप केला नाही. महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या हातून जाणं ही या राज्यासाठी दुर्घटना आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे

“हे खरं आहे की इंडिया आघाडीच्या बाबातीत तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांनी भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही, हे सत्य आहे. समन्वय नसेल तर त्याची किंमत भविष्यात सर्वांना मोजावी लागेल. काँग्रेस पक्ष देशातील सर्वांत मोठा पक्ष आहे. त्याने पुढाकार घेऊन एकत्र येण्याकरता पुढाकार घेतला पाहिजे. आमच्यात राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आहे. त्यामुळे ही त्यांची जबाबदारी आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.