प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची सध्या तळ्यात-मळ्यात अशी स्थिती आहे. हा पक्ष कधी महाविकास आघाडीत सहभागी झाला आहे असं सांगितलं जातं तर कधी आंबेडकरांचे मविआबरोबरचे वाद समोर येतात आणि प्रकाश आंबेडकर सांगतात की, आमचा पक्ष अद्याप मविआचा सदस्य नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक आहे. तसेच महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष त्यास अनुकूल आहेत. मविआतला प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाशी वंचितची आधीपासूनच युती आहे. तरीदेखील वंचितच्या महाविकास आघाडीतल्या सहभागाबाबत संभ्रम कायम आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि मविआतील पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वंचितचा कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर कधी ठाकरे गटातील खासदार संजय राऊतांबरोबर संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, वंचितने आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला डावलून थेट आणि केवळ काँग्रेसची चर्चा सुरू केली आहे. आंबेडकरांनी काँग्रेस पक्षप्रमुखांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “मी महाराष्ट्रातील ७ जागांवर वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळणाऱ्या कोणत्याही ७ मतदारसंघांची नावं त्यांनी आम्हाला द्यावी. त्या सात जागांवर वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देईल. आम्ही तिथल्या काँग्रेस उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघात, मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा देऊ.” दरम्यान, आंबेडकर यांनी वंचित मविआबरोबर राहण्याची शक्यता नाही, असं वक्तव्य केलं आहे. यावर मविआकडून प्रतिक्रिया आली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी एकट्या काँग्रेसला पत्र पाठवलं आणि आणि त्यांच्याकडे सात जागांची यादी मागितली आहे. त्या सात जागांवर पाठिंबा देणार वगैरे… मग उरलेल्या जागांवर त्यांचा (वंचितचा) उमेदवार उभा करून ते काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणार आहेत का? प्रकाश आंबेडकर असे गुंते निर्माण करतात, वेगवेगळी कोडी टाकतात. हे प्रकाश आंबेडकरांचं रिडल्स इन पॉलिटिक्स प्रकरण आहे.

हे ही वाचा >> मनसेचं ‘इंजिन’ यार्डात जाणार? दीपक केसरकर म्हणाले, “महायुतीने राज ठाकरेंना दिलेल्या प्रस्तावानुसार…”

ठाकरे गटातील खासदार म्हणाले, आम्ही प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान केला आहे आणि यापुढेही करू. आमच्यात हुकूमशाहीविरोधात लढण्याची एकवाक्यता आहे. आम्ही संविधान रक्षणासाठी एकत्र यायचं ठरवलं आहे. देशात संविधानाची रोज हत्या होतेय. त्यामुळे मला वाटत नाही की प्रकाश आंबेडकर हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संविधानाची हत्या करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहतील. आम्ही वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. परंतु, उद्या शरद पवार, नाना पटोले आणि आम्ही इतर काहीजण बसून यावर चर्चा करणार आहोत. त्या प्रस्तावावर पुन्हा एकदा चर्चा केली जाईल. कुठलाही प्रस्ताव कधीच अंतिम नसतो. त्यावर चर्चा होत असतात.