राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर चर्चांच्या फेऱ्या होत असताना दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगात आल्याचं दिसत आहे. आता काही महिन्यांत लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार असल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून सरकारमध्ये गेलेल्या गटांविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांनी टोला लागावल्यानंतर त्यावर आता पुन्हा संजय राऊतांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. नेमका वाद काय? संजय राऊतांनी आक्रोश मोर्चामध्ये केलेल्या भाषणात अजित पवारांना लक्ष्य केलं होतं. "मी एक वक्तव्य ऐकलं, ‘काहीही झाले तरी मी तुम्हाला पाडणारच…’. पण, आमच्या पाडा पाडीच्या खेळात पडलात, तर पहिले तुम्ही पडाल. नाव घेऊन बोलायचं असतं. आमच्यात दम आहे. ‘हवा बहोत तेज चल रही है, अजितराव.. टोपी उड जाएगी", असं संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊतांच्या या विधानावर अजित पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. आज सकाळी पेरणे फाटा येथील विजयस्तंभावर अभिवादन केल्यानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊतांच्या टीकेबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी "सल्या सोम्यागोम्याने बोललेल्यावर मी बोलत नाही", असं म्हणत तो प्रश्न उडवून लावला. संजय राऊतांची खोचक टीका! दरम्यान, अजित पवारांच्या या विधानावर संजय राऊतांनी पुन्हा एकदा त्यांना लक्ष्य केलं आहे. "त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली आहे, जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नये. यापेक्षा जास्त मला बोलण्याची गरज नाही. २०२४ ला सोमेगोमे कोण हे कळेल", असं राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले. “अजितराव… टोपी उड जायेगी”, संजय राऊतांना अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले, “असल्या सोम्यागोम्याने..” "महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, राज्याचे उद्योग, रोजगार पळवले जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान हो असताना सध्याच्या सरकारमधले हौशे, नौशे, गौशे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. त्यांना आमच्यावर किंवा इतर कुणावर बलण्याचा अधिकारच नाही. इतके नामर्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाले नसतील. फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने जे लटपटतायत ते काय आमच्यावर बोलतायत? त्यांनी बोलूच नये", असं राऊत म्हणाले.