शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवरून भाजपाकडून आक्रमक पवित्रा अवलंबण्यात येत आहे. संजय राऊत यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहे. यावर आज माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. “मी कुणालाही औरंगजेब म्हणालो नाही. मी औरंगजेबी विकृतीवर बोललो होतो. तसेच जे महाराष्ट्रावर चाल करून येतील, त्यांना गाडू. हे कुणाला व्यक्तिगत बोललेलो नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर चाल करण्याचा प्रयत्न केला, त्यांना याच महाराष्ट्राच्या मातीत गाडलेले आहे, हा इतिहास आहे. इतिहासात अफजल खान, शाहिस्तेखान असेल किंवा औरंगजेब असेल. ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले केले, त्यांना इथे गाडले गेले. यात काही चुकीचे नाही. त्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

“मी नकली असेल, तर तुम्ही बेअकली”; उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर; म्हणाले, “बाळासाहेबांचे नाव घेण्यापूर्वी…”

पंतप्रधानांचे विधान अत्यंत दळभद्री

बुधवारी तेलंगणातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ असा केला होता. याचाही समाचार संजय राऊत यांनी घेतला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना जर नकली संतान कुणी बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अवमान आहे. संपूर्ण महाराष्ट्र मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानतो. या दोघांच्या बाबतीत अत्यंत दळभद्री विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.”

संजय राऊत पुढे म्हणाले, “हा प्रश्न फक्त उद्धव ठाकरे यांचा नाही आहे. हा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांना माननाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. तेलंगणात जाऊन उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे.”

गद्दारांना गद्दारच बोलणार

उबाठा गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणून संबोधल्यानंतर शिंदे गटाकडून याची जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली. याबद्दल संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनीही हाच आरोप केला. “एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० सहकाऱ्यांना पूर्ण देश गद्दार म्हणून ओळखतो. कोण काय बोलले, हे मला माहीत नाही. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह जे लोक एनडीएत गेले, लोक त्यांना गद्दार म्हणून हिणवत आहेत. ‘५० खोके, एकदम ओके’, हे कुणाला म्हटले जाते? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.