सातारा : सातारा जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवरील धोकादायक जागा, पॉइंटवर जाण्यास १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध लादण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. पावसाळ्यात धोकादायक जागांवर पर्यटकांचे वाढते अपघात विचारात घेत या स्थळांवर हे निर्बंध लादण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून साताऱ्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. ज्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. या भागातील महाबळेश्वर, पाचगणीसह अनेक धबधबे, गिरिस्थळांवर या काळात पर्यटक पावसाची मजा लुटण्यासाठी येत असतात. मात्र, या स्थळांवरील धोकादायक जागा, पॉइंटवर काळजी न घेतल्याने अनेक अपघात होत असतात. यामध्ये अनेकांना जीवही गमवावा लागतो. याचा विचार करूनच जिल्हा प्रशासनाच्या वतीने या स्थळांवर हे निर्बंध लादण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या भागात सततच्या पावसामुळे डोंगरकपारीच्या जागा निसरड्या झालेल्या असतात. दाट धुक्यामुळे पर्यटकांना खोल दरी, कडे याचाही अंदाज येत नाही. नदी, ओढे, नाले, धबधब्याच्या ठिकाणीदेखील पाणी वेगाने वाहते. या सर्व जागी निष्काळजीपणे वावरल्यामुळे पर्यटकांचे सतत अपघात घडतात. यामध्ये जीवदेखील गमवावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करतच जिल्हा प्रशासनाने हे निर्बंध लादले आहेत.
पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी नाही. मात्र, धोकादायक जागा, पॉइंट, डोंगरकडे, धबधब्याखाली जाण्यास, तेथील पाण्यात शिरण्यास, घाटमाथ्यावर वावरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशा ठिकाणी जमाव जमविणे, गोंधळ घालणे, मद्यपान करत धिंगाणा करणे या वृत्ती आढळून येत असल्याने हा बंदी आदेश बजावण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. – संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा.