राज्यातील ३१ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५४ पोलीस उपायुक्त /अपर अधीक्षक यांच्या सह ९२ साहाय्यक पोलिस आयुक्त उपाध्यक्ष यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ६ सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. तर औरंगाबाद नागपूर, वाशिम, अमरावती धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली आहे. आपल्या उत्कृष्ठ कार्यशैलींने साताऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांची व पोलीस खात्याअंतर्गत सर्वांची मने जिंकणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांची मुंबई येथे कार्यकारी संचालक सुरक्षा व अंमलबजावणी विभाग राज्य विद्युत वितरण कंपनी या जबाबदार पदावर बदली झाली आहे .त्याजागी राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपयुक्त अजित बोऱ्हाडे यांची नियुक्ती झाली आहे.
धीरज पाटील यांनी साताऱ्यात आल्यापासून अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आपल्या विशिष्ठ आणि उत्कृष्ठ कार्यशैलींने सर्वसामान्य नागरिकांची व पोलीस खात्याअंतर्गत सर्वांची मने जिंकत आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. त्यांनी पंकज देशमुख,तेजस्वी सातपुते आणि अजयकुमार बन्सल यांच्याबरोबर काम केले. धीरज पाटील यांनी प्रशासनाचा चांगला वचक बसविला होता. लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि मुख्यालय यांच्यामध्ये उत्कृष्ट समन्वय साधण्याचे काम त्यांनी केले. कोठेही वादाचे मुद्दे उपस्थित होणार नाहीत याची काळजी घेत संवेदनशील व अतिसंवेदनशील प्रकरणे हाताळली. गुन्हेगारांना वचक राहील यासाठी विविध उपाय योजले.अनेक महत्वपूर्ण गुन्ह्यांमध्ये त्यांचा तपास उल्लेखनीय ठरला. जिल्ह्यातील अभिलेखा वरील गुन्हे नगर गुन्हेगारांवर लक्ष ठेवत क्राईमसह पोलिसिंग राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
करोना प्रदुर्भावाच्या काळात नागरी हित सांभाळत नियमांचे पालन करण्यात त्यांचे प्राधान्य राहिले. करोना बाधित झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या उपचारावर त्यांनी विशेष लक्ष दिले. यासाठी राज्यातील पहिले पोलीस करोना रुग्णालय उभारण्यात, करोनात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यातही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यात शांतता राखण्यात, कायद्याची अंमलबजावणी करण्यास त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. वेगळ्या पद्धतीने गुन्ह्यांची उकल करण्याची त्यांची ख्याती होती .वाई येथील परदेशी नागरीकांचे अवैधरित्या घरातच गांजा पिकविण्याचे प्रकरण आणि वाई येथील दुहेरी खून प्रकरणात त्यांनी स्वतः घटनास्थळी थांबले.अशा अनेक प्रकरणांमध्ये व तपास करण्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. वरिष्ठ पोलीस अधिकारी असूनही एक संवेदनशील व कडक शिस्तीचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्या कामाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.त्यांच्या जागी आलेल्या अजित बोऱ्हाडे यांच्याकडूनही साताऱ्यातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.